आतापर्यंत राज्यात फक्त 46 टक्के भागावर पेरण्या
पुणे – राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका हा उन्हाळी पिकांना बसला आहे. आतापर्यंत राज्यात फक्त 46 टक्के भागावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात 78 टक्के पेरण्या झाल्या होत्या. राज्यात यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. विशेष करून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात तर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे, अनेक ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी पिकांकडे पाठ फिरविली आहे.
राज्याच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात उन्हाळी पिकांचे तब्बल 1.68 लाख हेक्टर क्षेत्र आहे.आत्तापर्यत फक्त 0.78 लाख हेक्टर भूभागावरच पेरण्या झाल्या आहेत. त्यात ही सर्वात जास्त पेरण्या या कोकण विभागात झाल्या आहेत या विभागात 0.13 लाख हेक्टर क्षेत्र उन्हाळी पिकांचे असून त्यापैकी 0.07 क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. हे प्रमाण 54 टक्के इतके आहे. सर्वात कमी लागवड ही औरंगाबाद विभागात झाली आहे.
या विभागात फक्त 0.07 टक्के इतक्या पेरण्या झाल्या आहेत. या विभागात सध्या सगळ्यात जास्त पाणी टंचाई जाणवत आहे. लोकांना पाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही.अनेक शहरांमध्ये तर दहा ते बारा दिवसातून एकदा पाणी येत आहे. इतकी गंभीर परिस्थिती असल्याने आता जनावरे तरी कशी जगावायची ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पुणे विभागात ही आत्तापर्यत फक्त 24 टक्के पेरण्यात झाल्या आहेत. या विभागात 0.25 लाख हेक्टर उन्हाळी पिकांचे क्षेत्र आहे त्यापैकी 0.06 लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत.