खालापूर, (वार्ताहर) – मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २६) खोपोली, शिळफाटा शहरात पोलिसांनी रुटमार्च झाला. लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासंबंधीचे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी या वेळी केले.
मावळ लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शांतता – सुव्यस्था कायम रहावी, राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत व्हावा, या उद्देशाने खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आले.
सकाळी १० वाजता खालची खोपोली अग्निशमन दलाच्या मैदानावरून पथसंचलनास प्रारंभ करण्यात आला. खोपोली बाजारपेठ, शास्त्रीनगर, पाटणकर चौक, समाज मंदीर रोड, शिळफाटा बाजारपेठ, गणेश नगर, पटेल नगर नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्याचा समारोप करण्यात आला.
या वेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजित गडदे, कर्मराज गावडे, उपपोलीस निरिक्षक सुधाकर लहाने, अलोक किस्मतराव, अभिजीत व्हरंबले, पूजा चव्हाण, गोपनीय विभागाचे प्रदीप खरात, सतीश बांगर, पोलीस हवालदार सागर शेवते, प्रसाद पाटील यांच्यासह सीमा सुरक्षा दल ४७ जवान आणि खोपोली ठाण्यातील ३७ पोलीस अमंलदार उपस्थित होते.