शेतकऱ्यांची जोरदार मागणी : भूजल पातळी खालावली
शिक्रापूर – कान्हूर मेसाई (ता. शिरुर) परिसरातील गावांसह पश्चिम भागातील पाबळ, चिंचोली मोराची, शास्ताबाद, खैरेनगर, लाखेवाडी परिसरातील विहिरी कोरड्या पडू लागल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला बनला असल्याने शासनाने तत्काळ चारा छावणी सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कान्हूर मेसाईसह पश्चिम भागात मार्च महिन्याच्या प्रारंभीच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे परिसरात विहिरींसह विंधन विहिरीमध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिला आहे. अनेक लहान मोठे बंधारे कोरडे पडले़ आहेत. मात्र, पाणीसाठा कमी झाल्याने नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
चारा पिके पाण्याअभावी जळू लागली असल्याने चाऱ्याची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची तरी कशी, असा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांना पडला असल्याने चारा छावणी सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकरी चिंताग्रस्त
उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाणी पातळी घटली असताना विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत असल्याने शासनाने तत्काळ चारा छावणी सुरू करणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शहाजी दळवी यांनी सांगितले.