नागपूर – भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते नितीन गडकरी नागपूर येथे लोकसभा निवडणूक लढवत असल्यामुळे या मतदारसंघांची देशभरात चर्चा आहे. एकेकाळी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या दोन निवडणुका गडकरी यांनी जिंकल्या आहेत. यावेळी मात्र कॉंग्रेसला नागपूरकडून आशा आहे.
वास्तविक गेल्या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली होती. तरीही बेरोजगारी, स्थानिक सुविधांच्या मुद्द्यांची गोष्ट केली तर आणि जातीच्या समीकरणांचा विचार केला तर आपल्याला विजयाची अपेक्षा असल्याचे कॉंग्रेसजनांचे म्हणणे आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री आणि सर्वोच्च कामगिरी करणारे मंत्री असा गडकरी यांचा लौकीक आहे. मंत्री म्हणून त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड उत्तम आहे. त्यामुळेच मला विजयाची खात्री आहे. त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
तथापि, मला नागपूरकरांची ७५ टक्के मते हवी आहेत असे गडकरी यांचे म्हणणे आहे. तर गडकरी यांना यावेळी पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून देणार असे दावे त्यांचे समर्थक करत आहेत.
कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे विकास ठाकरे यांच्या रूपाने एक भक्कम स्थानिक उमेदवार आहे. २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना रिंगणात उतरवले गेले होते. त्या तुलनेत आताचे ठाकरे हे स्थानिक आणि उत्तम पर्याय असल्याचे कॉंग्रेसजनांचे मानणे आहे.
नागपूरचे माजी महापौर म्हणून विकास ठाकरे एक लोकप्रिय नाव आहे. एका चांगला नेता अशी त्यांची प्रतिमा आहे आणि आता ते नागपुरातूनच आमदारही आहेत. सरकारविरूध्दच्या नाराजीचा फटका भाजपला बसेल असा विश्वास ठाकरे यांना वाटतो आहे.
नागपुरातील जनता बेरोजगारी, महागाई, पाणी आणि विजेच्या समस्यांमुळे चिंतीत आहे. अनेक वर्षांपासून महापालिका भाजपच्या ताब्यात आहे, मात्र ते लोकांना पाणी उपलब्ध करून देउ शकले नाहीत. शहरातील रस्त्यांची अवस्थाही चांगली नाही.
सगळीकडे सिमेंट कॉंक्रीट टाकला म्हणजे विकास होत नाही. युवकांना रोजगार हवा, लोकांना पाणी हवे आणि स्वस्त दरात वीज उपलब्ध झाली पाहिजे. ते देण्यात भाजपला अपयश आले आहे असे ठाकरे यांचे म्हणणे आहे.