मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तिकीट न मिळाल्याने अनेक विद्यमान खासदार नाराज असल्याचे समोर येत आहे. काही जण बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे ( Shivsena) 7 खासदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे हे नाराज खासदार स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत परतण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यातच आता विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे या चर्चेला चांगलीच हवा मिळाली आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गत झाली? उद्धव ठाकरे भेटत नसल्याची ओरड करणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही. त्यांचे निम्मे खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
शिंदे व अजित पवार गट गोंधळलेल्या स्थितीत –
वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचाही संकल्प व्यक्त केला. सद्यस्थितीत शिवसेनेचा शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट गोंधळलेल्या स्थितीत आहे. भाजपचीही मोठी दमछाक सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न निश्चितच धुळीस मिळवेल, असे ते म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भात काँग्रेसला प्रचंड पोषक परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही जागांवर जनता काँग्रेसला आपला कौल देईल. विद्यमान सरकार विरोधात जनतेत प्रचंड राग व चीड आहे.