खालापूर, (वार्ताहर) – सहज सेवा फाऊंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि. 2) सामुदायिक विवाह सोहळ्यात 60 जोडप्याचा खोपोली येथे विवाह पार पडला. आदिवासी व अन्य विविध समाजातील 60 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा खोपोलीतील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला.
या विवाह सोहळ्यातील नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्व जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी बोलताना बाळाराम म्हात्रे म्हणाले की, अश्या विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे. सहज सेवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करतो. हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,
उपाध्यक्षा इशीका शेलार, सचिव अखिलेश पाटील, सहसचिव नम्रता परदेशी, खजिनदार संतोष गायकर, सहखजिनदार बनिता साह, महिला संघटक निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, खालापूर तालुकाप्रमुख मोहन केदार आदी प्रमुखांचं अन्य सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत 200 पेक्षा अधिक जोडप्याचा विवाह संपन्न झालेला आहे. 2 एप्रिल 2025 रोजी सुद्धा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
मतदानाबाबत जनजागृती
येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेप्रमाणे या लग्न सोहळ्यात जनजागृती करण्यात आली.