कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात ज्वारी काढणीला वेग आला आहे. रखरखत्या उन्हात बळीराजाची शेती शिवारात उन्हाळी पीक काढण्यास लगबग सुरू आहे. मावळ तालुक्यात नाणे मावळ, अंदर मावळ आणि पवन मावळ अशा सर्वच ठिकाणी नाही पीक काढणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.
तर काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मजूर मिळाले तर दिवसाला पुरुषाला पाचशे रुपये हजेरी तर महिलांना तीनशे रुपये हजेरी घ्यावी लागत आहे.
काही ठिकाणी मजुरांअभावी यंत्राच्या साह्याने तर काही ठिकाणी परिवारातील सदस्यांच्या सहाय्याने पिकांची काढणी सुरू आहे. तीव्र उन्हाची झळ सोसत बळीराजा पीक काढणीच्या कामात व्यस्त आहे.
यावर्षी बळीराजाच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी समाधानी दिसत आहेत. शेतकरी आपल्या जनावरांसाठी चारा एकत्र करताना दिसत आहेत. प्रामुख्याने ज्वारी पिकाच्या काढणीत वेग आला आहे. ही पिके काढून मळणी करून पोत्यात भरून उरलेल्या पेंढी करून तो जनावरांच्या चाऱ्यांसाठी रचून ठेवत आहेत.