नवी दिल्ली – बेंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी आज सांगितले की, गेल्या तीन-चार दशकांमध्ये राज्यात इतका भीषण दुष्काळ पडला नव्हता. राज्यासाठी पुढील दोन महिने “खूपच जास्त महत्वाचे आहेत असे ते म्हणाले.
या संकटाचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे सांगून ते म्हणाले, शहरातील पाणी माफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.गेल्या 30-40 वर्षांत आम्ही असा दुष्काळ पाहिला नव्हता; यापूर्वी दुष्काळ असला तरी आम्ही कधीच इतक्या मोठ्या संख्येने तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले नव्हते,असे शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
बेंगळुरू विकासाचे प्रभारी असलेले शिवकुमार म्हणाले की, शहरात जिथे जिथे कावेरी नदीच्या पाण्याचा पुरवठा करायचे आहे तिथे ते केले जात आहे, परंतु बेंगळुरूमधील १३९०० बोअरवेलपैकी ६९०० कुपनलिका बंद पडल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, आम्ही पाणीपुरवठा टँकरची व्यवस्था केली आहे.
कर्नाटकने २४० पैकी २२३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, त्यापैकी १९६ तालुके गंभीर दुष्काळग्रस्त म्हणून वर्गीकृत आहेत. विरोधक या मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून शिवकुमार म्हणाले की, प्रशासनाने पाणी माफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि खाजगी बोअरवेलमधून पाणी पुरवण्याचे प्रयत्न केले आहेत.
टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचेही पुर्ण नियोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली आणण्यात आली असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.बंगळुरूच्या आसपासच्या ११० गावांना कावेरीच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही ते म्हणाले.
पाणी “माफिया” नियंत्रित करण्यासाठी, त्यांची नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक खाजगी पाण्याच्या टँकरनी नोंदणी केली आहे बेंगळुरू, रामनगरा, मगडी, दोड्डाबल्लापुरा, होस्कोटे आणि आसपासच्या भागात सिंचन बोअरवेल आहेत, ते म्हणाले, आम्ही त्यांची मोजणी केली आहे, आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तेथून पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.