सोमाटणे, (वार्ताहर) – महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक उपवास करतात. या आठवडाभरापासून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. आवक चांगली असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो १० रुपयांची घट झाली आहे. तर साबुदाण्याचा दर स्थिरावलेला आहे.
मागील वर्षी १५० रुपयांवर असलेले शेंगदाणे आता १४० रुपये किलो झाले आहेत. भूईमुगाचे चांगले उत्पादन झाले असल्याने भावात घट झाली आहे. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये फराळाच्या पदार्थांचे वाटप केले जाते. तर घरोघरी उपवास केला जात असल्याने किरकोळ बाजारात साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा, खजूर आणि फळांच्या मागणीमध्ये वाढ होते. रोजच्या स्वयंपाकासह उपवासात वापरला जाणारा शेंगदाणे मागील वर्षी तेजीत होते.
आता त्यात घट झाली आहे. महिनाभरात दरात किलोमागे १० ते १२ रुपयांची घट झाली आहे. १५० रुपये किलोवरून दर १४० रुपयांवर आला आहे. नवीन आवक सुरू झाल्याने ही घसरण झालेली आहे.
मे महिन्यात साबुदाना महागणार
साबुदाना ९० रुपये किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तो स्थिरावलेला आहे. मात्र, मे आणि जूनमध्ये याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्पादन चांगले असून मागणी कमी झालेली आहे.
भगर महागली
अनेक ठिकाणी महाशिवरात्रीला उपवासात भगर खाण्याची प्रथा आहे. त्यानुसार भगरीची मागणी वाढलेली आहे. गेल्या महिन्यात ११५ रुपये किलो असलेली भगर आता १२० ते १२५ रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे. मागणी वाढल्याने ही भाववाढ झालेली आहे.
खजूर, राजगिरा लाडूला मागणी
फराळाच्या पदार्थांप्रमाणेच खजूर, राजगिराचे तयार लाडू व अन्य पदार्थांच्या मागणीत वाढ नोंदविली जात आहे. सध्या बाजारपेठेत १४० रुपये किलोपासून खजूर बाजारात उपलब्ध आहे. गुणवत्तेनुसार ३०० रुपये किलोपर्यंतचे खजूर मिळते. राजगिराच्या तीन, सहा, बारा लाडूचे पॅकेट बाजारपेठेत उपलब्ध असून, ते १० रुपयांपासून तर ३५ ते ४० रुपयात मिळत आहे.