मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याचा मास्टरमाइंड मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह असल्याचा खळबळजनक दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच चांदीवाल अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अँटिलियाजवळ 25 फेब्रुवारी 2021 रोजी एका स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेचा हा कट असल्याचे तेव्हा भासविण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना काही दिवसांनी या स्कॉर्पिओ वाहनाचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह सापडला.
या सर्व तपासात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच मास्टरमाइंड असल्याचे समोर आले. त्यांना तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यासह चार एपीआयची देखील मदत केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. हा तपास अहवाल प्राप्त झाल्यावर आम्ही प्रथम परमबीर सिंह यांची बदली केली आणि नंतर निलंबित केले. तर, सचिन वाझेला बडतर्फ करण्यात आले.
मात्र, या दोघांच्या मार्फत विरोधकांनी आमच्यावर आरोप केले. परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणीचा केलेला आरोप त्याचाच भाग होता. त्यानंतर न्यायमूर्ति (सेवानिवृत्त) के़ यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या एक सदस्यीय आयोगाने याची चौकशी केली.
आयोगाने दिलेल्या अहवालात आपल्याला क्लीनचिट दिली असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होती. त्यामुळेच त्यांनी हा अहवाल दीड वर्ष दडवून ठेवला. या अधिवेशनात तो सभागृहात मांडण्याची विनंतीही सरकारला केली. पण त्यांनी ऐकले नाही. या अहवालातील निष्कर्ष सर्वांसमोर आले पाहिजेत. जनतेला सत्य समजले पाहिजे, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.
माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपाचे पुरावे न्यायालयात ते सादर करू शकले नाहीत. पण, या सर्व आरोपांबाबतचे पुरावे माझ्याकडे एका पेनड्राइव्हमध्ये आहेत. निवडणूक प्रचारात ते मी लोकांना दाखवणार आहे. म्हणूनच, चांदीवाल अहवाल जाहीर करा, अन्यथा प्रसंगी मी न्यायालयात जाईन.
– अनिल देशमुख, माजी मंत्री