नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयची रेड पडू शकते अशी शंका आपल्याला अगोदरच आली होती. त्यामुळेच काश्मीरच्या संदर्भात जे पुस्तक आपण लिहिले आहे त्याची हस्तलिखित प्रत अगोदरच आपण सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली आहे असा दावा जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
मलिक गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र त्याच सुमारास त्यांच्याशी संबंधित २२ ठिकाणांवर सीबीआयने छापे घातले आहेत. या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी रूग्णालयातूनच एका इंग्रजी माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना ही माहिती दिली. छापेमारीचा आणि लोकसभा निवडणुकीचा परस्पर संबंध असल्याचा दावा करत विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा हा प्रयत्न व इच्छा असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
द ट्रुथ अबाऊट काश्मीर हे आपल्या पुस्तकाचे संभाव्य नाव आहे. या पुस्तकाबाबत मी एका जाहीर सभेत बोललो होतो. त्यामुळे लोकांना त्याची माहिती झाली. या पुस्तकाची २०० पाने आहेत व ती घरात ठेवणे सुरक्षित नाही याची मला जाणीव झाली. सीबीआयच्या छापेमारीमुळे माझी शंका खरी असल्याचे सिध्द झाले. निवडणुकीची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागू झाली की मी लगेचच हे पुस्तक छपाईसाठी देणार आहे.
अनेक प्रकाशक माझ्या संपर्कात आहेत असे मलिक यांनी सांगितले. छाप्यात काही कागद ते लोक घेऊन गेल्याचे माझ्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितले. माझा कॉम्प्युटर त्यांनी नेला नाही कारण मी त्याचा वापर करत नाही. ज्या कंपनीला कंत्राट दिले गेले त्या कंपनीची निवड माझ्या आदेशानुसार करण्यात आली होती असे पुरावे काही अधिकाऱ्यांनी सीबीआयला दिले आहेत.
मात्र हे सगळे साफ खोटे आहे. मी चार राज्यांचा राज्यपाल होतो. जम्मू काश्मीरनंतरही मी दोन राज्यांचा राज्यपाल होतो. मी का भ्रष्टाचार करेल? जर मी भ्रष्टाचार केला असता तर मला आणखी दोन राज्यांचे राज्यपाल केले असते का असा सवाल त्यांनी केला.