वाई, (प्रतिनिधी) – सरदार हिरोजी इंदुलकर सारथी किल्ले संवर्धन योजनेत वाई आणि सातारा तालुक्यांमधील ‘सारथी’ आणि एमएससीआयटी प्रशिक्षण केंद्रांच्यावतीने जिल्ह्यातील किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली.
यामध्ये वाई तालुक्यातील कवठे येथील विन्सटेक कॉम्प्युटर्स, भुईंज येथील मायक्रोबिट कॉम्प्युटर्स, पाचवड येथील फ्रेंडस् कॉम्प्युटर्स आणि सातारा तालुक्यातील लिंब येथील शिवांश इन्फोटेक व किडगाव येथील प्रेरणा कॉम्प्युटर्स या केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी चंदन वंदन किल्ल्यावर स्वच्छता केली.
वाई तालुक्यातील श्री टेक्निकल, सुरभी कॉम्प्युटर्स, संजीवनी कॉम्प्युटर्स आणि गुरुकुल कॉम्प्युटर्सच्या विद्यार्थ्यांनी किल्ले रायरेश्वरवर, सातारा तालुक्यातील केंद्रांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर, जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील केंद्रांनी प्रतापगड किल्ल्यावर, चिमणगाव व कोरेगाव तालुक्यातील केंद्रांनी साखरगडावर, कराड व पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी तळबीड व वसंतगड किल्ल्यावर, माण तालुक्यातील केंद्रांनी वारुगड किल्ल्यावर, खंडाळा व रहिमतपूर येथील केंद्रांनी साखरगड किल्ल्यावर ही मोहीम राबवली.
संस्थेच्यावतीने स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांना टोप्या, मास्क, झाडू, कुदळी, फावडे आणि कचरा उचलण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या व टोपल्या पुरवण्यात आल्या होत्या. ही मोहीम शिवजयंतीदिनी (दि. 19) आणि मंगळवारी (दि. 20) राबवण्यात आली. चंदन वंदन गडावर मोहिमेची सुरुवात करताना शिवध्वज फडकवून, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. आर्या पोळने शिवगर्जना दिली.
साहिल डेरे, रोहित भोसले यांनी विद्यार्थ्यांनी गड आणि मावळ्यांच्या पराक्रमाविषयी माहिती दिली. शिवकालीन इतिहास, हिरोजी इंदुलकर व मावळ्यांच्या पराक्रमाला विद्यार्थ्यांनी उजाळा मिळाला.