Ramdas Athawale : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण लवकरच अमित शहांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून, काँग्रेसमधील 12 ते 14 आमदार चव्हाण आपल्यासोबत घेऊन जाणार असल्याचीसुद्धा मोठ्या प्रमाणाता चर्चा होत आहे.
अश्यातच, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेयांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. याबाबत रामदास आठवले म्हणाले की, “माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला.
मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. अशोक चव्हाण यांनी महायुतीमध्ये यावे. तसेच महायुतीमधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा, असे आवाहन मी त्यांना करतो, असे आठवले यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे,
आता नवा पर्याय शोधावा असे वाटते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील राजीनामा दिला आहे.