सुंदरगढ (ओडिशा) – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या २५ व्या दिवशी ओडिशात असून त्यांनी आज राउरकेला, सुंदरगड येथील वेदव्यास मंदिराला भेट देऊन तेथे पुजा व प्रार्थना केली.
यात्रेच्या आजच्या २५ व्या दिवसाची सुरुवात राहुल गांधींच्या पश्चिम ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील वेदव्यास धामच्या भेटीने झाली. या मंदिराची गुहा ही ऋषी आणि कवी वेद व्यास यांची गुहा मानली जाते. याच व्यासांनी महाभारताची रचना केली आहे.
या संबंधात माहिती देताना जयराम रमेश यांनी म्हटले आहे की आज आम्ही ओडिशातील राउरकेला येथे असलेल्या प्राचीन वेदव्यास मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. महर्षी वेदव्यास यांनी या ठिकाणी महाभारत हा महान ग्रंथ रचला, जो आपल्याला अनीती आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतो. अन्यायाविरुद्ध सुरू झालेली न्यायाची लढाई अशी सुरू राहील असे त्यांनी म्हटले आहे.
सुंदरगढ जिल्ह्यातील बिरामित्रपूर या छोट्या औद्योगिक शहरामध्ये यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष सरत पटनायक यांना राष्ट्रध्वज दिला.
यात्रा शहरात येण्यापूर्वी बिरामित्रपूर गाव राहुल गांधींच्या बॅनर, कट-आउट आणि होर्डिंग्जने सजले होते. आम्ही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी न्यायाचा झेंडा हाती घेतला आहे. आमचा न्याय हक्क मिळेपर्यंत आम्ही पुढे जात राहू, असा निर्धार आम्ही केला आहे. ओडिशातील जनतेचे उत्स्फूर्त स्वागत केल्याबद्दल धन्यवाद असे यात्रा संयोजकांनी आपल्या एक्स हँडलवर नमूद केले आहे.
तत्पूर्वी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १६ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात पोहोचत असताना त्यात सामील होण्याचे आमंत्रण पत्र पाठवले.१६ फेब्रुवारी रोजी चंदौलीच्या सय्यदराजा येथील नॅशनल इंटर कॉलेजमध्ये जाहीर सभेत संयुक्त सभा घेण्यासाठी अखिलेश यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचे हे निमंत्रण आम्ही स्वीकारले असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी रोजी मणिपूरच्या थौबल येथून निघाली. ही यात्रा ११० जिल्ह्यांतून ६७ दिवसांत ६७०० किलोमीटरचा प्रवास करेल. १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा विभागातून ही यात्रा जाणार आहे.