नगर – सावेडीत युवकांच्या जुन्या भांडणातून संपत बारस्कर यांच्या घरावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या, तसेच घरात घुसून संपत बारस्कर व त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आशा संपत बारस्कर (वय ४३ , धंदा गृहिणी, रा. दोन महालाजवळ, भिस्तबाग) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संपत बारस्कर हे शेती करतात. त्यांचा मुलगा वैभव संपत बारस्कर व मयूर सोमवंशी (रा. पश्चानगर पाईपलाईन रोड) यांच्यात सुमारे १४ महिन्यापूर्वी भांडण झाले असल्याने मयुर सोमवंशी याने मुलाविरुद तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासून मयूर सोमवंशी व त्याचे इतर मित्र घरासमोरुन जाताना दुचाकीचा जोरजोरात आवाज व आरडाओरडा करतात. याकडे कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले.
(दि.२) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बारस्कर कुटुंबीय घरात जेवण करीत असताना घरामागच्या खिडकीवर दगड मारल्याचा आवाज आल्याने काय झाले हे पाहण्याकरीता घरातून बाहेर आले. तेव्हा तेथे मयूर सोमवंशी, त्याचा भाऊ गौरव सोमवंशी व त्याचे मित्र अभि तिरनदास, राज पवळे, रोहीत साळुंके, सोमनाथ गुंजाळ, चंदन ढवण व विकास ढवण (सर्व रा. पद्यानगर, पाइपलाइन रोड) हे त्यांच्या हातात लाकडी काठ्या व लोखंडी रॉड घेऊन उभे होते. घरासमोरील रोडवरील पडलेले दगड घेऊन ते खिडकीच्या काचावर मारत होते.
फिर्यादीने त्यांना विचारणा केली असता त्यांनी मुलगा वैभव व मयुर सोमवंशी यांच्यात यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन शिविगाळ सुरू केली. त्यातील मयुर सोमवंशी व चंदन ढवण हे पत्र्याच्या कंपाउडवरुन आत आले व त्यांनी फिर्यादी व त्यांचे पती संपत बारस्कर यांना धक्काबुक्की करून तुझा मुलगा वैभव कोठे आहे, त्याला पाहुनच घेतो, त्याला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून मयुर सोमवंशी याने संपत बारस्कर यांची कॉलर पकडून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तुझ्या पोराला समजावून सांग, त्या वैभवला निट राहायला लाव, नाहीतर त्याला सोडणार नाही, अशी धमकी देऊन ते सर्वजण तेथून निघून गेले. या फिर्यादीवरून आठजणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.