पुसेगाव – आपल्या देशात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे असून, घराबाहेर पडल्यानंतर नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्निल कदम यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने झालेल्या ’रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती आणि नियम’ यावरील कार्यक्रमात ते बोलत होते. प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले, प्रा. डॉ. संजय क्षीरसागर, प्रा. एस. आर. माळी, प्रा. एस. आर. धोंगडे व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वप्निल कदम म्हणाले, वाहने अत्यंत काळजीपूर्वक चालवावीत. वाहनांची निगा वेळच्या वेळी राखली पाहिजे. वाहनचालक परवाना, वाहनाचा विमा, पीयूसी सर्टिफिकेट काढणे अत्यंत गरजेचे आहे. अपघातग्रस्तांना वेळीच मदत केल्यास त्यांचे जीव वाचू शकतात. दोन वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवावे. चालकाने मद्यपान करू नये. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये रस्ते सुरक्षततेबाबत जागृती केली गेली पाहिजे.
प्राचार्य डॉ. भोसले म्हणाले, मानवी जीवन अनमोल आहे. वाहनाने प्रवास करताना स्वतःबरोबर रस्त्यावरून चालणार्या व्यक्तींच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. दुचाकीवर हेल्मेटचा वापर करून, मोबाइलचा वापर टाळावा. समाजाला ध्वनिप्रदूषणाचे परिणाम समजावून सांगितले पाहिजेत. प्रा. डॉ.क्षीरसागर यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. धोंगडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. के. जी. कुंभार यांनी आभार मानले.