वाळद येथे आढळराव पाटील यांनी सोडले तिखट बाण
विद्यमान खासदारांनी करोना काळात जनतेला सोडले होते वार्यावर
राजगुरुनगर – शिरूर मतदारसंघात करोना काळात जनतेत राहून त्यांच्या समस्या अडचणी सोडवल्या. गरीब गरजूंना 25 टन किराणा किट वाटप केले. मी डॉक्टर नसतानाही मी करोनात जनतेची सेवा केली; मात्र सध्याचे खासदार डॉक्टर असतानाही त्यांनी जनतेकडे करोना काळात दुर्लक्ष केले. आगामी निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल, असा घणाघात माजी खासदार तथा शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केला.
शिवाजी आढळराव पाटील व पुणे जिल्हा प्रमुख तथा खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्या विशेष प्रयत्नातुन व विकासनिधीतून वाळद (ता. खेड) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन बुधवारी (दि. 31) आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या सभेत त्यांनी खासदार कोल्हेंवर तिखट बाण सोडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर होते.
याप्रसंगी वाळदचे सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच पोखरकर, विक्रम पोखरकर, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. प्रशांत पोखरकर, नितीन गोरे, मारुती सातकर, विजयसिंह शिंदे, धनंजय पठारे, विजय हरसाळे, विशाल पोतले, ज्योती आरगडे, संभाजी कुडेकर, नयना झनकर, अंबर सावंत, अशोक पोखरकर, आरती कांबळे, धनंजय फडके, वर्षा साळवे, संदीप येळवंडे, जालिंदर पोखरकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना, निवास्थान व संरक्षण भिंत आदी कामांचे उद्घाटन करण्यात आले.
आढळराव पाटील म्हणाले की, वाळद हे माझ्या हक्काचे गाव आहे. शिवसेनेने हक्काचा माणूस भगवान पोखरकर दिल्याने या भागाचा विकास केला. पोखरकर यांच्याकडे अधिकार्यांना मनवण्याची कला असल्याने गावासाठी मोठा निधी आणला. तीनवेळा खासदार असताना मतदारसंघात अनेक कामे केली मात्र दुर्दैवाने 2019 पराभव होवूनही मी डगमगलो नाही. लोकांचे प्रेम घेणे देणे ही माझी सवय आहे. म्हणून मी लोकांमध्ये आहे. खासदार नसलो तरी प्रेमाची माणसे माझ्यासोबत आहेत हे धोरण ठेवून गावागावात लोकांच्या समस्या समजून घेत गोर गरिबांना आधार देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गावातील अनेक रखडलेली विकासकामे मार्गी लागली आहेत. वाळद गावात सुसज्ज ग्रामपंचायत इमारत झाली त्याशेजारी सरपंच-उपसरपंच यांच्यासाठी निवास्थान बांधले आहे. गावात एकजूट आणि प्रतिनिधींवर विश्वास असेल तर गावाचा विकास होतो. आगामी लोकसभा निवडणुकीत घरातील उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांच्या पाठीशी ग्रामस्थानी उभे राहावे.
– भगवान पोखरकर, जिल्हा प्रमुख, शिवसेना (शिंदे गट)