कोलोंबो – श्रीलंकेत २०१९ साली ईस्टरच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या व्यक्तींना संतपद बहाल केले जाणार आहे, असे श्रीलंकेतील कॅथोलिक चर्चने जाहीर केले आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण २७३ जण मरण पावले होते.
त्यात ११ भारतीयांचाही समावेश आहे. ईस्टर हल्ल्याच्या पाचव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कॅथोलिक चर्चचे आर्चबिशप कार्डिनल माल्कम रणजीथ यांनी रविवारी झालेल्या सामुदायिक प्रार्थनेच्यावेळी ही घोषणा केली.
ख्रिश्चन धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनीच त्या व्यक्तीला संतपद बहाल केले जाऊ शकते. त्यामुळे ईस्टर संडेला झालेल्या हल्ल्यातील मृतांना संतपद देण्याची औपचारिक घोषणा या वर्षी २१ एप्रिल रोजी करण्यात येईल, असे ते म्हणाले.
श्रीलंकेत २१ एप्रिल २०१९ रोजी ईस्टरच्या दिवशी इसिसशी संबंधित असलेल्या नॅशनल थावहिद जमात या इस्लामी कट्टरवादी संघटनेने ३ चर्चमध्ये ९ आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यात जे मरण पावले त्यांनी बलिदान केले असे चर्च मानते म्हणून त्यांना संतपद बहाल केले जाणार आहे, असे रणजीथ यांनी सांगितले.
गेल्या ५ वर्षात या हल्ल्याच्या तपासावरही त्यांनी टीका केली. सरकारने या तपासामध्ये लपवाछपवी केल्याचा आरोपही त्यांनी केला. या हल्ल्याप्रकरणी शेकडो जणांना अटक केली गेली आहे आणि त्यांच्यावर खटले सुरू आहेत, असे सरकारने म्हटले आहे.