बावधन – बावधन हे गाव महापालिकेत येऊनही रस्ते, पाणी आणि वीज या प्राथमिक गरजांसाठी नागरिकांना वंचित रहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे परिसरातील श्री स्वामी समर्थनगर आणि क्षत्रियनगर येथील प्रश्न सोडविण्याबाबत पीएमआरडीए आयुक्तांशी चर्चा करून तत्काळ हे प्रश्न सोडविण्यात यावेत, अशी मागणी केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविताताई दगडे, तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सरपंच दिलीप दगडे, ग्रामपंचायत उपसरपंच दीपक दगडे, सदस्य सूर्यकांत भुंडे, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष अभिजीत दगडे, सुहास दगडे, यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी समस्या सोडवण्याबाबतचे निवेदन डाॅ. सतेज कोंढावदे, डाॅ. जितेंद्र ठाकुर, राजेंद्रा मालपुरे यासह नागरिकांनी सुप्रिया सुळे यांना दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, समाविष्ट गावात बावधन बुद्रुक हे गावही महापालिकेत आले. मात्र, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. गाव ग्रामपंचायतीत असताना सविताताई दगडे यांनी दोनवेळा निधी आणला, मात्र तो माघारी गेला. नकाशावर रस्ता आहे, मात्र तो खासगी मालकिचा असल्यामुळे रस्ते तयार करताना अडचणी येत असून, तत्काळ हा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी पीएमआरडीए आयुक्तांना केली आहे. तसेच येथील विजपुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था आणि पिण्याचे पाणी या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देऊन ती सोडविण्याच्या सूचनाही केल्या आहेत.