कराड – स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून घारेवाडी, ता. कराड येथे शिवम अध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने 23 व्या बलशाली युवा हृदय संमेलनास उत्साहात प्रारंभ झाला.
नागपूर येथील दिव्यांग उद्योगपती जयसिंग चव्हाण, प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख, अध्यक्ष राहुल पाटील, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता आनंद मोरे, आशुतोष गोडबोले, प्राप्तिकर अधिकारी जयवंत चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रतिष्ठानचे विश्वत आणि विविध जिल्ह्यांमधून आलेले शिबिरार्थी उपस्थित होते.
‘बिनपंखांची गरुड भरारी’ या विषयावर जयसिंग चव्हाण यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, सकारात्मक विचारांबरोबर जिद्द ठेवा. कुटुंबाला प्राधान्य द्या. पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. उद्योग सुरू करून रोजगार देणारे व्हा, मानसिकदृष्ट्या स्वावलंबी बना. मी 87 टक्के दिव्यांग असून, माझ्यात 13 टक्केच जीव आहे. ऊर्जा मात्र 100 टक्के भरली आहे. मी आजही कार, जहाज चालवतो. स्वीमिंग करतो. माणसाने सतत काहीतरी करत राहिले पाहिजे. पैशापेक्षा जीवाभावाचे नाते जपा.
घेणार्यापेक्षा देणारे हात व्हा. दरम्यान, दिव्यांग असूनही अवघ्या 200 रुपयांत सुरुवात करून, कोट्यवधींचा उद्योग उभारणार्या जयसिंग चव्हाण यांचा जीवनपटाचा पाहून तरुणाई भारावली. ‘जगण्याचे गाणे होताना’ या विषयावर बोलताना अनघा मोडक यांनी युवकांशी हितगुज केले. राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. युवराज पाटील यांनी आभार मानले.