केपटाऊन – पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना मदत करेल असा अंदाज केपटाउनमधील खेळपट्टीबाबत व्यक्त केला जात होता. असे असूनही यजमान दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला याचेच मला आश्चर्य वाटत आहे असे मत, विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
ज्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता, उसळी घेत होता ते पाहता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने घेतलेला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय साफ चुकला असेच म्हणावे लागेल, असेही गावसकर म्हणाले.
दरम्यान, भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात गडी राखून सहज जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे. दुसऱ्याच दिवशी भारताने दुसरी कसोटी जिंकली. भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान होते. सिराजने पहिल्या डावात 6 बळी घेतले, तर बुमराहने दुसऱ्या डावात 6 फलंदाजांना आपले बळी बनवले.
IND vs SA Test Series : दक्षिण आफ्रिकेत ‘अशी ‘कामगिरी करणारा भारत ठरला पहिला आशियाई संघ…
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 55 धावांवरच मर्यादित राहिला. त्यानंतर भारत 153 धावांवर ऑलआऊट झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव आटोपला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी दुसऱ्या डावात 173 धावा केल्या. त्यामुळे भारताला 79 धावांचे लक्ष्य मिळाले आणि टीम इंडियानं तीन गडी गमावून त्याने हे लक्ष्य गाठले.