मुंबई – फोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी वर्णी लागली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा आणि त्यानंतर होण्याऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांची निवड करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
यासदंर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी बैठक घेतली होती. राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती. यात रश्मी शुक्ला यांचे देखील नाव होते.
दरम्यान, त्यांना महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली जाणार याबाबत संभ्रम होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पोलीस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. महासंचालक रजनीश शेठ हे निवृत्त झाले असून त्यांच्या जागी आता रश्मी शुक्ला या नव्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
मुख्य सचिव मनोज सौनिक येत्या ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. सौनिक यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार मुख्य सचिवपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टॅपिंगच्या प्रकऱणातील शुक्ला यांच्या विऱोधातील चौकशी बंद झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी शुक्ला यांच्या विरोधातील फोन टॅपिंगचे दोन बेकायदेशीर खटले फेटाळून लावले होते.
मुंबईतील पहिल्या एफआयआरमध्ये शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदेशीररीत्या फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.