नवी दिल्ली- बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीश कुमार यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे. जातीच्या आधारावर जनगणना आणि आरक्षाच्या मुद्द्यवर बोलताना त्यांनी कॉंग्रेस पक्ष आपल्या कामाची चर्चा करत नाही असे म्हटले आहे.
तसेच त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीलाही लक्ष्य केले. हा पक्ष आपले कामही त्यांच्या कामात जोडून घेतो असा दावा त्यांनी केला. इंडिया आघाडीच्या जागावाटपात कॉंग्रेस कडूनच विलंब असल्याचा मतप्रवाह जनता दलाच्या बैठकीत मांडण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून जातीच्या आधारावर जनगणना हा विषय संयुक्त जनता दलाने प्रामुख्याने लावून धरला आहे. आपल्या बिहार राज्यात त्यांनी अशी जातनिहाय जनगणना केली आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हा मोठा राजकीय मुद्दा करायचा आहे.
आता नितीश कुमार यांच्याकडेच पक्षाची सूत्रे पुन्हा आल्यामुळे येत्या काळात हा मुद्दा त्या पक्षाकडून जोरकसपणे लावून धरला जाण्याची चिन्हे आहेत. त्याचेच प्रतिबिंब पक्षाच्या आजच्या बैठकीत पाहायला मिळाले आणि नितीश यांनी कॉंग्रेसलाही लक्ष्य केले.