नवी दिल्ली – संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष ललन सिंह यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नितीश कुमार यांच्याकडे अगोदरच राजीनामा सोपवला आहे, मात्र नितीश यांनी तो स्विकारलेला नाही. वेगवेगळे दावे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे संयुक्त जनता दलाचे नेते आणि आता आरएलजेडी पक्षाचे अध्यक्ष असलेले उपेंद्र कुशवाह यांनी ललन यांच्या संदर्भात खळबळजनक दावा केला आहे.
एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले कुशवाह म्हणाले की ललन सिंह सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच ते आता राजीनामा देत आहेत. त्यांनी अगोदर नितीश यांना मोठी मोठी स्वप्ने दाखवली की नितीश पंतप्रधान होतील. मात्र विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्यात नितीश यांना आघाडीचे निमंत्रकही करण्यात आले नाही. ललन सिंह यांनाच हे अपयश आल्यामुळे ते हताश झाले आहे व त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला आहे.
कुशवाह म्हणाले की ललन यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनाही आश्वासन दिले होते की ते संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय जनता दलात विलिनीकरण करतील. त्यानंतर तेजस्वी यादव यांना बिहारचा मुख्यमंत्री केले जाईल. लालूंना दाखवलेले हे स्वप्न पूर्ण करण्यातही ललन अपयशी ठरले आहेत. लालू आणि नितीश या दोघांना दाखवलेली स्वप्ने त्यांना पूर्ण करता आली नसल्यामुळे ते आता स्वत:ची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी राजीनामा देत आहेत. दरम्यान, ललन यांच्या राजीनाम्याबाबत आपल्याला फार काही माहिती नाही. ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरच आपण बोलतो आहोत असेही कुशवाह यांनी स्पष्ट केले.