पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे पक्ष सहकारी आणि संयुक्त जनता दल संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश दिला आहे. तथापि कुशवाह यांनीही संघर्षाची भुमिका घेत नितीशकुमार यांनाच आव्हान दिले आहे. त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “पितृ संपत्तीत” वाटा घेतल्याशिवाय मी पक्ष सोडू शकत नाही.
कुशवाह हे भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्कात’ असल्याच्या बातम्यांनंतर नितीशकुमारांनी हे पाऊल उचलले आहे. उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटले आहे की, थोरल्या भावांच्या सांगण्यावरून धाकटे भाऊ असेच घर सोडत राहिले तर सर्व थोरले भाऊ धाकट्याला फेकून देऊन बाप-दादांची (पूर्वजांची) संपत्ती हडप करतील. संपूर्ण संपत्तीत माझा वाटा सोडून मी (पक्षाबाहेर) कसा जाऊ शकतो? असा सवाल त्यांनी ट्विटरवर केला आहे.
दरम्यान, संयुक्त जनता दलाचे दुसरे नेते उमेश कुशवाह यांनी उपेंद्र कुशवाह यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “उपेंद्र कुशवाह यांना त्यांच्या वागणुकीची लाज वाटली पाहिजे. नितीश कुमार यांनी त्यांना खूप काही दिले आहे पण ते जेडी(यू) तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तातडीने पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे. आतापर्यंत त्यांनी सदस्यत्व मोहिमेसाठी फॉर्म सबमिट केलेला नाही. जर त्यांना थोडी तरी नैतिकता असेल तर त्यांनी स्वतः पक्ष सोडावा.” “नितीशजींनी त्यांना उपेंद्र सिंगपासून उपेंद्र कुशवाह बनवले. त्यांनी त्यांना संसद आणि परिषदेत पाठवले,” असा दावाही उमेश कुशवाह यांनी केला आहे.
संयुक्त जनता दल मजबूत झाल्यानंतर उपेंद्र कुशवाह यांनी पक्षात प्रवेश केला आणि आता पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी रविवारी उपेंद्र कुशवाह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या अफवांचे खंडन केले होते. शनिवारी उपेंद्र कुशवाह यांच्या भाजपसोबतच्या कथित जवळीकतेच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ते कुशवाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.