पाटणा – जेडीयु पक्षाने बिहारमधून भाजपला सत्तेतून बाहेर केल्यानंतर भाजपचे नेते नितीशकुमार यांच्यावर सातत्याने विविध प्रकारचे आरोप करीत आहेत. तथापि त्यांच्या आरोपांना जेडीयु व राजद नेत्यांकडून तितक्याच तत्परतेने उत्तरे दिली जात आहेत. भाजपच्या सुशिलकुमार मोदी यांच्या दाव्यांना प्रत्त्युत्तर देताना जेडीयुचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी भाजप नेत्यांना सन 1995-96 सालच्या उपकाराची आठवण करून दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, त्या काळात भाजपची स्थिती राजकीय अस्पृश्य पक्ष अशी होती. त्यावेळी देशातला कोणताही राजकीय पक्ष त्यांच्याशी युती करण्यास तयार नव्हता. त्यावेळी जॉर्ज फर्नांडीस आणि नितीशकुमार या नेत्यांनी पुढे येऊन भाजपशी राजकीय युती केली आणि भाजपच्या वाट्याला आलेली राजकीय अस्पृश्यता संपवली होती.
हे उपकार तुम्ही विसरलात काय? असा सवाल कुशवाह यांनी भाजप नेत्यांना केला आहे. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस आणि नितीशकुमार यांनी भाजपवर ती कृपा केली नसती तर आज भाजपचा काही आतापताच उरला नसता. भाजपचे लोक कृतघ्नतेची सारी सीमा पार करून गेले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.