रांजणगाव गणपती – २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर रोजी शिवनेरी पायथा ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे याठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चा होणार आहे. दि. २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या पाबळ आणि शिक्रापूर येथे ही सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आक्रोश मोर्चाला सर्व शेतकरी व कष्टकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) शेखर पाचुंदकर पाटील यांनी केले आहे.
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या नियोजनानिमित्त महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी दुधाचे कमी झालेले भाव, कांद्याची निर्यातबंदीमुळे होणारे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, बिबट्याचा वाढलेला प्रादुर्भाव आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा, या मागण्याची चर्चा करण्यात आली. शिरूर तालुक्यात मोर्चादरम्यान पाबळ आणि शिक्रापूर येथील सभा यशस्वी होण्यासाठी नियोजन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे महेश ढमढरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख पोपटराव शेलार, काॅग्रेस आयचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिवसेना शिरूर शहरप्रमुख संजय देशमुख, प्रभाकर गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरूर आंबेगाव अध्यक्ष सनी थिटे, शेतकरी काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामदास थोरात, मलठणचे सरपंच नानासाहेब फुलसुंदर, निमगाव भोगीचे माजी सरपंच उत्तमराव व्यवहारे, कान्हुरचे माजी उपसरपंच दीपक तळोले आदी मान्यवर उपस्थित होते.