पुणे – खडकवासला धरणासाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत अडीच टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिकेने खडकवासला धरणातील कमी उचलण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने केल्या आहेत. याबाबत लवकरच चर्चा करून पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी दिली.
यंदा पाऊस कमी झाल्याने धरणे ९७ टक्केच भरली आहेत. त्यात, ग्रामीण भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता असल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाणी जुलै २०२४ अखेरपर्यंत राखीव ठेवले जाणार आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेकडून दैनंदिन पाणी वापर कमी करण्याची सूचनस जलसंपदा विभागाने केली आहे. महापालिका सध्या खडकवासला धरणातून दररोज १,५१० एमएलडी पाणी घेत आहे.
तर, या पुढे महापालिकेस अडीच टीएमसी पाणी वाचवायचे असल्यास पालिकेस हा पाणी वापर दैनंदिन १,२५० एमएलडीपर्यंत कमी करावा लागणार आहे. मात्र, त्यासाठी शहरातील पाणी वापर कमी करावा लागणार आहे. त्यासाठी पाणीकपात करणे अथवा गळती शोधून पाणी वाचविणे हे दोन पर्याय आहेत. त्यासाठी महापालिकेस आधी त्याचा आराखडा करावा लागणार असून तो जलसंपदा विभागास सादर करून त्यानंतर कपातीबाबत चर्चा केली जाणार आहे.
सध्या ७९ टक्के पाणीसाठा
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २३.०३ टीएमसी (७८.७७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत २५.८५ टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे अडीच टीएमसीने कमी आहे. सध्या सुरू असलेले रब्बीचे आवर्तन आणि त्यानंतर उन्हाळी आवर्तन असे सुमारे साडेआठ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेसाठी जुलै अखेर पर्यंत १४.७६ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.
“पाणी वापरासंदर्भात जलसंपदा विभागाचे पत्र आहे. पण, त्यांच्याशी चर्चा करून पाणी वापराबाबतच नियोजन निश्चत केले जाईल. यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. त्यानुसारच कपातीचा निर्णय घेतला जाईल. कोणत्याही स्थितीत अघोषित कपात अथवा इतर पद्धतीने शहराचे पाणी कमी केले जाणार नाही. त्याबाबत निर्णय घेऊन घोषणा केली जाईल.” – विक्रम कुमार, आयुक्त, मनपा