मुंबई – “इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावे लागते? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? ‘नवाब’चा ‘जवाब’ द्या की नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल !” असा इशाराच या पोस्टच्या माध्यमातून मनसेकडून सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे आता मनसेच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून काही प्रत्युत्तर देण्यात येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दाऊदशी संबंध असल्याने नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ते काहीच महिन्यांआधी वैद्यकीय जामिनावर बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसल्याने राजकारणात खळबळ उडाली.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून “सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा…” असे ट्वीट केले. पण दाऊदचा हस्तक असलेला इकबाल मिरची याच्याशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत भाजपाकडून काहीही बोलण्यात येत नसल्याने या मुद्द्यावरून आता राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाने भाजपाला कोंडित पकडले असताना आता मनसेकडूनही प्रश्न उपस्थित करत सरकारला इशारा दिला आहे.