पुणे – शहर तसेच जिल्ह्यातील पाणीपुरवठा आणि सिंचनाची दारोमदार असलेल्या खडकवासला धरणसाखळीत दि. ३१ जुलैपर्यंतचा पाणीसाठा राखीव ठेवला जाणार आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत दोन टीएमसी कमी पाणी आहे. सध्या खडकवासला धरणातून उचलण्यात येणार्या पाण्यातून दोन टीएमसी पाणी वाचविले जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग आणि महापालिकेची नुकतीच बैठक झाली आहे.
खडकवासला धरणातील दैनंदिन पाणी वापर २०० एमएलडीने कमी केला जाणार आहे. त्यात, मांजरी परिसरासाठीचे कालव्यात सोडले जाणारे १५० एमएलडी कमी केले जाणार असून, भामा आसखेड धरणातून पाणी वापर वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
खडकवासला धरणातून २५ नोव्हेंबरपासून रब्बीचे आर्वतन सुरू करण्यात आले आहे. सुमारे अडीच ते तीन महिने हे पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर उन्हाळी आवर्तनाचे नियोजन प्रस्तावित असले, तरी यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा नाही, यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने धरणे ९७ टक्केच भरली होती.
मागील वर्षी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांत जानेवारीच्या मध्यापर्यंत १०० टक्के पाऊस होता. मात्र, यंदा पाणीसाठा कमी असल्याने उन्हाळयात तीव्र पाणीटंचाईची भीती आहे. ही बाब लक्षात घेता, महापालिका आणि जलसंपदा विभागाकडून आतापासूनच पाणी बचतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
असे वाचविणार पाणी
महापालिकेकडून मांजरी गावासाठी कालव्यातून पाणी दिले जाते. त्या परिसराला दरदिवशी २१ एमएलडी पाण्याची आवश्यकता असली, तरी धरणातून १५० एलएलडी पाणी सोडले जाते. हे पाणी महापालिकेच्या दैनंदिन पाणीवापरात पकडले जाते. त्यामुळे महापालिकेकडून लष्कर जलकेंद्रातून बंद जलवाहिनी द्वारे मांजरीच्या पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी दिले जाणार आहे, हे काम अंतिम टप्प्यात आहे. जलसंपदा विभागाच्या जागेतील काम शिल्लक आहे. त्यामुळे परवानगी मिळताच हे काम आठ दिवसांत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
दुसर्या बाजूला भामा-आसखेड धरणातून प्रतिदिन २०़० एमएलडी पाणी मंजूर आहे. महापालिका दिवसाला १४५ एमएलडीच पाणी घेते. त्यामुळे एसएनडीटी तसेच होळकर जलकेंद्रांवरील सुमारे ४५ ते ५० एमएलडी पाणी भामा- आसखेडमधून देणे शक्य आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.