सातारा – दिवाळीच्या सुट्ट्यांची चाहूल लागण्यापूर्वीच सातारकरांना पर्यटनाचे वेध लागले असून सहकुटुंब भटकंतीचे नियोजन नागरिक करु लागले आहेत. 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सुट्टयांचा मुहूर्त साधून सातारकर पर्यटक छोट्या सुट्ट्यांसाठी कोकणातील समुद्रकिनारे, महाबळेश्वर, गोव्याला जाणार आहेत.
तर, मोठ्या सुट्ट्यांसाठी राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि अंदमानकडे कूच करण्यासाठी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे बुकींग होवू लागले आहे. पर्यटनाला जाण्याची महाबळेश्वर, कोयना, माथेरान लोणावळा, कोकणातील तारकर्ली, देवबाग, दिवेआगार, गणपती पुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची (एमटीडीसी) कोकणसह सर्व रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत.
महाराष्ट्रात दुष्काळ झळा आणि घटलेला रोजगार अशी परिस्थिती असली तरी दिवाळी बोनस आणि बचत केलेल्या पैशातून स्थानिक तसेच आंतरराज्य पर्यटनाचे बेत नागरिक आखू लागले आहेत. नोकरदार तसेच सातारकरांनी सुट्ट्यांमध्ये दोन व तीन दिवसाच्या पॅकेज टूरला पसंती दिली आहे. पर्यटनाला जाण्याची महाबळेश्वर, कोयना, माथेरान लोणावळा, कोकणातील तारकर्ली, देवबाग, दिवेआगार, गणपती पुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची (एमटीडीसी) कोकणसह सर्व रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत.
केरळ, राजस्थान, हैद्राबाद, गिरनार, उदयपूर, मनाली अशा आंतरराज्य पर्यटनाला पसंती दिली जात आहेत. खाजगी टूर्स व ट्रॅव्हल्स कडून पंधरा ते वीस टक्के सवलतीत पॅकेज टूरला मागणी वाढली आहे. साताऱ्यातील महिला बचत गटांनी अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठे, महालक्ष्मी कोल्हापूर, विशाळगड, पावनखिंड या छोट्या सहलींना प्रचंड मागणी आहे.
कोरोनाच्या दृष्टचक्रातून जगाची सुटका झाल्यानंतर अर्थचक्राला गती आली आहे. सगळे व्यवहार पूर्ववत सुरु झाल्याने ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशी मंडळी आता पर्यटनाकडे वळू लागली आहे. दिवाळीच्या सुट्टीत गुलाबी थंडीचा आनंद लुटत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सातारा शहरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयात गर्दी दिसू लागली आहे.
नागरिक पॅकेज सहलींची माहिती घेवून बुकींग करत आहेत. महाबळेश्वर व पाचगणी तर दीपावलीच्या सुट्टीत हाऊसफुल्ल होणार आहे. याबरोबरच कास, बामणोली परिसरात बाहेरुन पर्यटनाचा आनंद लुटण्यास येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली असून कोयना जलाशयातील बोटींगसह तेथील निसर्गरम्य परिसरात सुट्टी घालवण्यासाठी या परिसरातील हॉटेल्स, लॉजिंगचे बुकींग झालेले आहे.
समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन स्थळांना पसंती
सीझनमुळे खासगी हॉटेल्सना देखील चांगली मागणी असून, नागरिकांनी दोन महिन्यांपूर्वीच बुकिंग केले आहे. राज्यांतर्गत पर्यटनासाठी या वर्षीही कोकणला विशेषतः समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनस्थळांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. दिवाळी पाडव्यापासून कोकणातील तारकर्ली, वेंगुर्ला, देवबाग, अलिबाग, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, दिवेआगर, गुहागर हे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलणार आहेत.
पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी स्थानिक पर्यटन संस्थांनी या वर्षी लहान-मोठे महोत्सवही आयोजित केले आहेत. याशिवाय साताऱ्यातून दुबई, मालदिव, फुकेत , क्वालालंपूर, पट्टाया येथील परदेशी सहलीना पसंती मिळत असल्याचे परदेशी टूर्स ट्रॅव्हल्सचे रोहन परदेशी यांनी सांगितले.