कोपरगाव -काही मंडळी गणेश साखर कारखाना सुरळीत चालू नये म्हणून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहे. “गणेश’ च्या सभासदांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला समाधानकारक भाव दिला जाईल. सर्व सभासदांना 10 किलो साखर मोफत देऊन सभासदांची दिवाळी गोड केली जाईल. कारखान्यासह गणेशनगर परिसराच्या प्रगतीसाठी सर्व सभासद शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन गणेश कारखान्याचे मार्गदर्शक विवेक कोल्हे यांनी केले.
श्री गणेश साखर कारखान्याच्या सन 2023-24च्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन शुक्रवारी ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले. या वेळी संचालिका शोभाताई गोंदकर व एकनाथ गोंदकर, संचालक अनिल टिळेकर व सुनीता टिळेकर, नानासाहेब नळे व कमल नळे, आलेश कापसे व कमल कापसे, संपतराव चौधरी व मंगल चौधरी या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, सुरेश थोरात, गंगाधरराव चौधरी, सुधीर म्हस्के, लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरे, जगन्नाथ वाकचौरे, अप्पासाहेब बोठे, शिवाजीराव लहारे, भाऊसाहेब चौधरी, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, नानासाहेब शेळके,आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुधीर लहारे यांनी केले.
आ. थोरात म्हणाले, गणेश कारखाना अडचणीच्या काळात आमच्याकडे आला आहे. गेल्या आठ वर्षांत त्यांनी कारखान्याचे वाटोळे केले. त्यांना गणेश कारखाना चालवायचा नव्हता तर बंद पाडायचा होता. त्यांचा हेतूच चांगला नव्हता. प्रवरा कारखान्याने गणेश कारखान्याकडे 81 कोटींची मागणी केली आहे. हा आकडा रोजच वाढत असून, यात निश्चितच काळेबेरे आहे, असा आरोप त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे नाव न घेता केला.
“हक्काच्या पाण्यासाठी एकत्रित लढा उभारावा’
गोदावरी कालव्याद्वारे मिळणारे हक्काचे पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर पाटपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यात आधीच पाण्याची मोठी तूट असून, सध्या नगर व नाशिक जिल्ह्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तरीही समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेगिरी समितीच्या शिफारशीचा आधार घेऊन जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. हक्काचे पाणी वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढ्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.