कराड -वर्षभरात राज्यात 15224 अपघाताती मृत्यू झाले असून 20 हजाराहून अधिक गंभीर जखमी झालेत. यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अपघात थांबवण्यासाठी वाहतूक नियमांचा प्रसार व प्रबोधन करणे गरजेचे आहे. अपघातातील जखमींना गोल्डन हावर्समध्ये मदत केल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. हे काम “मृत्युंजय दूत’ करत आहेत. राज्यात 3606 प्रशिक्षित मृत्युंजय दूत तयार केले असून वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातच होणार नाहीत, असे मत महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी व्यक्त केले. महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या इमारत नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ नुकताच राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल (मुंबई) व सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी परीक्षेत्र पोलीस उपाधीक्षक श्रीमती लता फड, पोलीस उपअधीक्षक महामार्ग पोलीस विभाग गजानन टोमपे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कराडचे पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक विजय पाटील, महामार्ग पोलीस निरीक्षक कोल्हापूर विभाग भरत पाटील, महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत पडळकर, माजी पं.स. सदस्य नामदेव पाटील, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे यांच्यासह पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सिंगल म्हणाले, महामार्ग पोलीस हा महत्त्वाचा विभाग आहे. महामार्गावरील अपघातात मदत करणे व रात्रीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महामार्ग पोलीस यंत्रणा कार्यरत असते.
पोलीस अधीक्षक शेख म्हणाले, काम करण्याची जागा चांगली असेल, तर काम चांगले होते. या मदत केंद्राद्वारे प्रवाशांसह वाहनधारकांना खूप मदत होईल. चौकीचे रूप बदलले आहे. महामार्ग पोलीस व सातारा पोलीस समन्वय साधून जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू. महामार्ग पोलिसांना नेहमीच आमचे सहकार्य असते, यापुढेही लागेल ती मदत सातारा पोलीस करतील. प्रस्तावित लता फड, सूत्रसंचालन महेंद्र भोसले, हणमंत पडळकर यांनी आभार मानले.