भारताला एके काळी ‘सोन्याची चिमणी’ म्हटले जायचे. भारतातील या संपत्तीमुळेच परकीयांनी देशावर आक्रमण केल्याचेही म्हंटले जाते. भारतावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केल्यानंतर मौल्यवान वस्तू लुटल्या. यात सिहांसन, हिरे, दागिने, तलवार, वाघनख यांचा समावेश आहे. त्या वस्तू स्वातंत्र्यानंतर परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातील बहुतांश कलाकृती ब्रिटनमध्ये विविध संग्रहालयांमध्ये जतन करण्यात आल्या आहेत. त्यापैकी, छत्रपती शिवरायांची वाघनखं भारतात पुन्हा आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र कोणालाही यश मिळाले नाही. त्यानंतर आता सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनख पुन्हा भारतात आणणार असल्याचे सांगितले आहे. इतकेच काय तर ती कधी आणली जाणार याची तारीखही जाहीर केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं ब्रिटनकडून लवकरच भारतात आणले जाणार आहेत. अर्थातच या निर्णयाचे महाराष्ट्रातील तमाम जनतेने स्वागत केले जात आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ब्रिटनला जाणार आहेत. ब्रिटन सरकारसोबत करार झाल्यानंतर वाघनखं आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी वाघनखं महाराष्ट्रात येतील. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत देण्याचे मान्य केले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.
वाघनखं ब्रिटनमध्ये गेली कशी?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखं ठेवण्यात आली आहेत. इसवी सन १८१८ ते १८२४ मध्ये ग्रॅण्ड डफ भारतात आला होता. डफला इतिहासाची आणि वस्तू संग्रहाची आवड होती. छ. प्रतापसिंह महाराजांनी ही वाघनखं ग्रॅण्ड डफला भेट म्हणून दिली होती. त्यानंतर डफने ही वाघनखं लंडनला नेली. डफच्या मृत्यूनंतर त्याच्या वंशजांनी ही वाघनखं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला दिली. दरम्यान, डफनेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हिस्ट्री ऑफ मराठा हे पुस्तक लिहिले आहे.
वाघनखांचा इतिहास काय?
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला होता. उंच आणि धिप्पाड असलेल्या अफझलखानाने शिवाजी महाराजांना भेटायला बोलावलं होतं. मिठी मारण्याच्या बहाण्यानं शिवाजी महाराजांना ठार मारण्याची त्याची योजना होती. मात्र महाराजांनी हा धोका आधीच ओळखला होता. अफझलखानाने महाराजांना आपल्या बाहूत दाबण्याचा प्रयत्न करताच महाराजांनी वाघनखांच्या साह्याने त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यामुळे ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची निशाणी आहे. ही वाघनख भारतात आणल्यानंतर मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर येथे ठेवण्यात येतील. 3 वर्षांसाठी वाघनख भारतात आणली जाणार असून 2026 साली ती परत इंग्लंडला नेली जाणार आहेत.
वाघनखांची रचना कशी आहे?
वाघाच्या पंजापासून प्रेरणा घेऊन ही ‘वाघनखं’ बनवण्यात आली आहे. वाघनखं हे तळहातात लपवून वापरलं जाणारं लोखंडी शस्त्र आहे. ते बोटांच्या सांध्यावर घातलं जातं. त्याला चार तीक्ष्ण टोकं असतात. ती लोखंडी तळाशी जोडलेली आहेत. या टोकांनी शत्रूच्या छातीला लक्ष्य केलं जातं. वाघाच्या नखांप्रमाणे दिसणारी ही टोकं इतकी टोकदार असतात की त्यांच्या हल्ल्यात शत्रूचा निश्चित मृत्यू होतो.
तीन जणांचे पथक जाणार लंडनला
हिंदू कॅलेंडप्रमाणे ज्या दिवशी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता, त्या दिवशीच ही वाघनखं परत आणली जातील. वाघनखं भारतात परत कशी आणायची यावरही चर्चा सुरु आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. वाघनखं परत आणण्यासाठी तीन जणांचं पथक लंडनला जाणार आहे. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, संस्कृती विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गार्गे यांचा समावेश आहे.
जगदंबा तलवारचा इतिहास
शिवाजी महाराजांकडे भवानी, जगदंबा आणि तुळजा अशा तीन तलवारी होत्या. या तीन तलवारींपैकी भवानी आणि तुळजा या तलवारींची माहिती नाही. या दोन्ही तलवारी सुमारे 200 वर्षांपासून बेपत्ता आहेत. जगदंबा तलवार सध्या लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात आहे. ही तलवार 2024 पूर्वी परत मिळवण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. कारण, पुढच्या वर्षी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षं पूर्ण होत आहेत. ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आल्यानंतर चौथ्या शिवाजी महाराजांनी वयाच्या अकराव्या वर्षी एक तलवार आणि एक कट्यार त्याला भेट दिले असल्याचे म्हंटले जाते.
काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए.आर अंतुले यांनी जगदंबा तलवार भारतात आणण्याची घोषणा सर्वप्रथम केली होती. ब्रिटनमध्ये असलेली जगदंबा तलवार परत आणण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी बरीच धडपड केली होती. मात्र, एका घटनेमुळं त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आणि जगदंबा तलवार आण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.