पुणे – गणेशोत्सव म्हटला की, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी “डेकोरेशन’, “देखावे’ महत्त्वाचे असते. पूर्वी केल्या जाणाऱ्या छोट्या, थोडक्यात, समाजप्रबोधनपर असलेल्या देखाव्यांनी आता भव्य-दिव्य स्वरूप धारण केले आहे. हे देखावे बनवणारे कलाकार हे तितकेच “क्रिएटिव्ह माइंड’चे असावे लागतात, त्यांच्या विचारांचे चक्र आणि प्रत्यक्षात तयारीही गणेशोत्सवाच्या चार महिने आधीच सुरू होते.
वर्षभरात घडणारा एखादा राजकीय, सामाजिक प्रसंग घेऊन समाजप्रबोधनपर देखावे पूर्वी सादर केले जात असत. त्यामध्ये रेकॉर्डेड संवांदांचा भाग सर्वाधिक होता. एका जागीच असणाऱ्या मूर्ती किंवा अन्य नेपथ्याच्या गोष्टी असायच्या. परंतु, हळूहळू या मूर्तींना हलत्या देखाव्यांचे स्वरूप आले आणि शब्देविण संवादू सुरू झाला. केवळ आवाज, म्युझिक या जोरावर हे देखावे सादर होऊ लागले. यामध्ये मुख्यत्त्वे पौराणिक, ऐतिहासिक या गोष्टींवर जोर होता, कारण या गोष्टी सर्वसामान्यांना माहिती असलेल्या असायच्या.
आता “देखावे’ कलेला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठे महाल, त्यातील अनेक नाविण्यपूर्ण गोष्टी एखाद्या चित्रपटाच्या सेटप्रमाणे भासणाऱ्या असतात. या बदललेल्या कलेचा प्रवास अनुभवणारे सजावटकार सतीश तारू या कलाकाराने नुकतीच या कलेची 50 वर्षे पूर्ण केली आहे. ते 68 वर्षांचे आहेत, त्यांनी या प्रवासाविषयी माहिती दिली. मातीचे किल्ले, किल्ल्यातील मावळे (चित्र) बनवण्यापासून त्यांनी सुरूवात केली. वास्तविक ही गोष्ट लहानपणी आवड म्हणून जोपासली गेली.
मात्र तिला ज्ञानप्रबोधिनी शाळेने आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेत बक्षीस मिळाले आणि आणखी हुरूप आला. त्यातून मूर्तीकला करण्याची आवड निर्माण झाली. छोट्या-छोट्या मूर्ती देखाव्यांसाठी बनवायला सुरूवात केली आणि देखाव्यांमध्ये ती मांडण्यालाही सुरूवात केली. त्याच्याभोवती एखादी सामाजिक कथा रचून ती सादर केली जाऊ लागली.
औंध येथील एका मंडळात त्यांनी याची सुरूवात केली. त्यानंतर लोखंडे तालीम, पांगुळआळी अशा अनेक मंडळाच्या सुपाऱ्या त्यांना या देखाव्यांसाठी मिळाल्या आणि त्यातून सुरू झाला प्रोफेशनल देखावे बनवण्याचा व्यवसाय! चार महिने आधीपासूनच विषयांची तयारी, त्याअनुषंगाने देखावे, मूर्ती बनवणे, त्याचे पोषाख बनवणे, स्क्रीप्ट रायटिंग, रेकॉर्डिंग या सगळ्या गोष्टींची तयारी केली जात असल्याचे सजावटकार तारू यांनी सांगितले.