मुंबई – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा करत आहे. यातच आता सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बंद दाराआड बैठकीवरून टीका केली आहे. “बैठकीला कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात तर कधी नागपूरचे. हे तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री येत नाहीत. हे सगळं जे चाललेलं आहे. ते सगळं आलबेल सुरू आहे. हे या महाराष्ट्रातील जनतेला सगळं नाटक, दिसत आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची पत घालवली आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.
“येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं मी म्हणत नाही. पण मुख्य खुर्ची बदलेल हे ठासून सांगतो, “असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून भाजपवर देखील निशाणा साधला. कर्नाटकात जो पुतळा हटवला. तो अनधिकृत पुतळा होता. त्या पुतळ्याचा चेहरा आणि महाराजांचा चेहरा यात फरक होता. अनधिकृतपणे तो पुतळा बसवला होता. भाजपने थोडी तरी माहिती घ्यावी. मूर्खा सारखे बोलू नका. कर्नाटकात भाजपचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 ते 12 पुतळे हटवण्यात आले होते. ते अनधिकृत होते. तेव्हा का बोलले नाही? तेव्हा तोंड शिवलं होतं का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी भाजपला केला आहे.
याआधी काय म्हणाले होते वडेट्टीवार ?
अजित पवार वारंवार शरद पवारांची भेट घेत आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून मुख्यमंत्रीपदावरून वडेट्टीवार यांनी धक्कादायक दावा केला होता. “शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना घातल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळेच ते सातत्याने शरद पवार यांना भेटून त्यांच्याकडे सोबत येण्याची दया-याचना करत आहेत,” अशी शक्यता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली होती.