नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मोदी आडनाव प्रकरणी त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी हा विरोधी आघाडी भारताचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच देशात आणखी काही मोठे घडणार असल्याचे संकेत दिले आहेत.
रविवारी 6 ऑगस्ट, 2023 त्यांनी आरोप केला की सरकारने राहुल गांधींविरोधात सूडाचे राजकारण केले आहे. येत्या काळात संसदेत आणखी तमाशा होणार आहे.
राहुल गांधी यांच्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी, ‘राहुल गांधी यांच्यासोबत तुम्ही सूडाचे राजकारण केले. भारत जोडो नंतर गोंधळलेल्या सरकारने राहुलजींना 24 तासांच्या आत तडकाफडकी काढून टाकले, त्यांचे सदस्यत्व रद्द केले आणि त्यांचे घर रिकामे केले. न्यायालयाच्या निर्णया नंतर लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा वाढला आहे.’ असे म्हणाले.
विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आणि संसदेत पंतप्रधानांची अनुपस्थिती यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि ते म्हणाले की, अविश्वास ठराव मांडला आहे, पण पंतप्रधान येणार की नाही, उत्तर देणार की नाही. मणिपूरवर ते गप्प का बसले आहेत.’ शत्रुघ्न सिन्हा यांनी नूह आणि मणिपूर हिंसाचारावरही सरकारवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, जे काही घडत आहे ते अत्यंत चुकीचे आहे, अतिशय निंदनीय आहे. धोकादायक आहे.
पुढे बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘मी कोणावरही आरोप करत नाही, पण पंतप्रधान या प्रकरणी गप्प कसे आहेत, हे मला समजत नाही. एक तर ते संसदेत येत नाहीत, उत्तरे देत नाहीत. ते हरियाणा आणि मणिपूरच्या घटनांवर बोलत नाहीत किंवा कोणालाही त्यावर बोलू देत नाहीत.” असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.