मुंबई – मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय हिंसाचाराला सुरुवात झाली. अद्यापही येथील वातावरण शांत झालेले नाही. यातच मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मणिपूरसह देशातील काही राज्यांमध्ये देखील दंगली होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषेदेमध्ये पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “मणिपूर, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांवर दगंली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणात दंगली झाल्या, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. महाराष्ट्रातमध्ये तसे वातावरण निर्माण व्हावं म्हणून भाजपचे काही गुरुजी मंडळी राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ती अशा विचारांना बळी पडणार नाही. या लोकांनी गुंडांना, भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातलं आहे. हे फडणवीस ज्यांना तुरुंगात पाठवणार होते, चक्की पिसिंगबद्दल बोलत होते, ते आता तुमचे मंत्रिमंडळातले सहकारी झाले आहेत. ते तुमच्या खिशात आहेत, हृदयात आहेत.”
खासदार संजय राऊत यांनी यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावरही टीका केली. खासदार राऊत म्हणाले, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, संत साईबाबा ही महाराष्ट्राची श्रद्धास्थान आहेत. महाराष्ट्र घडवण्यात यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याविषयी एखादी व्यक्ती असं काही बोलत असेल तर त्याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. ते तुमचे गुरुजी असतील तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या गुरुजींची पूजा करत बसा.” असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.