वाल्हे: पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) येथून वीर, हरणी, मांडकी, पिंगोरी, कवडेवाडी, आडाचीवाडी, परिंचे तसेच वाल्हे गाव आदी गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन, रस्त्यावर घसरगुंडी तयार झाली आहे.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे जवळील शहिद शंकर शिंदे चौका जवळील ओढ्यावरील पुलांचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे पर्यायी मार्ग म्हणून ओढ्यामध्ये पाइप टाकून त्यावर तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करण्यात आला होता. मागील आठवड्यापासून, रिमझीम पाऊस सुरू असल्याने या रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला असून, मंगळवारी (दि.25) आठवडे बाजार असल्याने वाल्हे व परिसरातील नागरिक, व्यावसायिक या रस्त्यावरून पायी जाताना, तसेच दुचाकीवरील प्रवास करताना, घसरगुंडी होत होती.
या रस्त्यावरून दररोज मांडकी, हरणी, जेऊर, पिंगोरी, आडाचीवाडी, वाल्हे आदी परिसरातील शालेय विद्यार्थी ये- जा करीत असतात. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण होणे गरजेचे आहे. याच रस्त्याने वीर येथील म्हस्कोबा देवदर्शनासाठी जाण्यासाठी लाखो भाविक भक्तांना याचे रस्त्याने जाताना-येताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच पिंगोरी येथील वाघेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये, पोचण्यासाठी याच चिखल रस्त्याने प्रवास करावा लागतो.
याच रस्त्याने वाल्हे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषिंची संजीवनी समाधी मंदिराकडे जाणार मुख्य रस्ता असल्याने महाराष्ट्रातूनच नवे तर देशाच्या कानाकोपऱ्यांतून अनेक भाविक येथे दर्शनासाठी वर्षभरामध्ये येत असतात. तरी, स्थानिक प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून या रस्ताचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी, मागणी येथील ग्रामस्थांच्यामधून तसेच प्रवासी यांच्याकडून होत आहे.
पुलाचे काम अद्याप सुरूच
या रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असून, या रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाचे काम अद्याप सुरू आहे. ते लवकरात-लवकर पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच हे काम पूर्ण होईपर्यंत चिखल झालेल्या रस्त्यावर मुरमीकरण करून घ्यावे. जेणेकरून या रस्त्यावरून प्रवास करणे सोईस्कर होईल, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.