यंदा पावसाची स्थिती पाहता आंबेगावात अद्यापही पेरणी बाकी
पेरणी झालेल्या क्षेत्रावरही दुबार पेरणीचे संकट
लाखणगाव – आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असूण 18 टक्के क्षेत्रामध्ये पावसाअभावी अजूनही पेरणी होणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून देण्यात आली.
सध्या पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर पेरणीची कामे खोळंबली आहेत. आंबेगाव तालुक्यात दरवर्षी खरीप हंगामात 100 टक्के एवढ्या क्षेत्रावर पेरणी होत असते; परंतु यंदा जुलै महिना संपत आला तरी पावसाअभावी 82 टक्के एवढ्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रावरही दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे एकंदरीतच यावर्षीची पावसाची परिस्थिती पाहता आणि झालेल्या पेरण्या पाहता तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून दमदार पाऊस पडावा अशी अपेक्षा येथील शेतकरी करत आहे.
डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू सागरामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली आले असून, येथे बारमाही पिके घेतले जातात. पावसावर सातगाव पठार, लोणी धामणी परिसर अनेक गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते.
त्याचप्रमाणे पश्चिम आदिवासी भागात पावसावर भाताची आवनी सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाचा पत्ता नसल्याने येथील शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत.