नवी दिल्ली – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शुक्रवारी न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भाटी यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती भुयान आणि भट्टी यांच्या शपथविधीमुळे, सर्वोच्च न्यायालयातील कार्यरत न्यायाधीशांची संख्या 32 वर पोहोचली आहे.सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची एकूण मंजुर पदे 34 इतकी असून आता केवळ दोनच पदे रिक्त आहेत.
केंद्र सरकारने तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असलेले न्यायमूर्ती भुयान आणि केरळमधील न्यायमूर्ती भट्टी यांच्या नावांना 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीसाठी पदोन्नती मंजुरी केली होती.कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बुधवारी दोन न्यायाधीशांच्या पदोन्नतीची घोषणा केली होती.सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 5 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती.