कोथरूड – चांदणी चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली असताना त्यात खड्ड्यांची भर पडली आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अवजड वाहने संथगतीने चालत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे यातून वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत.चांदणी चौकातील नवीन प्रकल्पाचे काम अंतीम टप्यात आलेले असले तरी प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत चौकातील कोंडी सुटणार नाही. सध्या, महामार्गालतच्या नवीन उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने कोथरूडकडून येणारी वाहने एनडीए रोडने महामार्गावर येतात, त्याचवेळी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी होतो आणि वाहतूक कोंडी होते.
पावसामुळे महामार्गावर खड्डे पडलेले असताना एखादा दुचाकी किंवा चारचाकी चालक मध्येच रस्ता क्रॉसिंगसाठी घुसला की कोंडीच कोंडी होते. त्यामुळे चौकातील खड्ड्यांची दुरूस्ती तातडीने करणे गरजेचे ठरत आहे. धोकादायक पद्धतीने महामार्गावर रस्ता क्रॉस करणाऱ्यांवर लगाम बसावा यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिगेट्स लावणे आवश्यक आहे.
कोथरूडकडून बावधन, मुंबई, मुळशीकडे जायचे म्हटल्यावर चौकातील कोंडी पाहून चिडचिड होते. त्यात खड्डयांमुळे वाहने अचानक बाजूला वळतात आणि अपघात आणि वाद होतो. त्यामुळे याठिकाणी वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी असणे आवश्यक आहे. रस्त्यावरील खड्डे दुरूस्ती केल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे स्थानिक रहिवासी सुर्यकांत भुंडे म्हणाले.