पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी
पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ नाही
धरणात दहा टीएमसी स्थिर पाणीसाठा
कोयनानगर – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. सध्या पावसाचा जोर कमी असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. धरणात सध्या पाणीसाठी दहा टीएमसीवर स्थिर आहे. मात्र, पूर्वेकडून सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्याची, मागणी होत असल्याने पायथा वीजगृह कार्यान्वित करून, नदीपात्रात 2100 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
धरणात गेल्या 15 दिवसांपासून अत्यल्प पाणीसाठा असून, वीजनिर्मितीचा तिसरा आणि चौथा टप्पा बंद आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये कोयनानगरला 59 मिमी, नवजा येथे 55 मिमी आणि महाबळेश्वर येथे 107 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. कोयनानगर येथे सोमवारी दिवसभरात 21 मिमी, नवजा येथे 29 मिमी आणि महाबळेश्वर येथे 25 मिमी पावसाची नोंद झाली. धरणाची जलपातळी 2029.10 फूट झाली आहे. पूर्वेकडील शेतीच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर होऊ लागल्याने धरणातील पायथा वीजगृह कार्यान्वित करून 2100 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने, धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम होणार आहे.