विठ्ठल सांवळा पंढरीये उभा।
धन्य त्याची शोभा शोभतसे।।
ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं ।
तो उभा रंगणीं वैष्णवांचे।।
पंढरपूर हे संतांचे माहेर असून विठ्ठल-रखुमाई हे त्यांचे माय-ाप आहेत. त्यामुळे सर्व संत आणि वारकरी आपल्या माता-पित्यांच्या भेटीसाठी प्रपंचातील नाती-गोती, दुःख, वेदना, अहंकार, ऐश्वर्यभोग दूर सारून पंढरपूरला जातात. प्रत्येक वर्षातील आषाढी व कार्तिकी एकादशीला मला भेटण्यास पंढरीस या. त्या दिवशी मला विसरू नका. असे विठ्ठल आपल्या सर्व भक्तांना प्रेमळपणाने सांगत आहे. त्यामुळेच लाखो वारकरी हे पंढरपूरला संतांच्या पालखी सोहळ्यासोबत 20-25 दिवसांचा पायी प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात. वारकरी संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्री-पुरुषांना खुले आहे. त्यात उच्च-नीच, गरी-श्रीमंत असा भेदभाव नाही.
विशेषतः आषाढी एकादशीला राज्यासह पर राज्यातील लाखो लोक विविध संतांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरला पायी येतात. वारकऱ्यांचा हा साधारण 20-25 दिवसांचा प्रवास असतो. या काळात उन्हाळा आणि पावसाळा अश्या दोन्ही ऋतुंचा अनुभव वारकरी घेत असतात. तीव्र उन्हात तसेच पावसात वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू असते. या काळात फक्त वाटचालच करावी लागत नाही, तर सोबतच खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मृदंग, वीणा, डोक्यावर तुळस घेऊन वारकरी नित्यनेम, भजन, कीर्तन, हरिपाठ म्हणत वाटचाल करावी लागते.
भजनामुळे प्रवास होतो सुखकर
तीव्र उन्हाचे चटके, पावसामुळे होणारी गैरसोय असा खडतर प्रवास करून वारकरी पंढरीला पोहोचतात. मात्र, हा खडतर प्रवास वारकऱ्यांना सुखकर वाटतो. त्याचे कारण म्हणजे मनात असलेली विठ्ठल भेटीची आस आणि वाटचालीत मुखी असलेले नामस्मरण.. या काळात लाखोंचा समाज एकत्र असतो. सर्वांचे एकच ध्येय असते ते म्हणजे भजन गात पंढरपूरला पोहोचून विठुरायाचे दर्शन घ्यायचे. यावेळी सर्वांमध्ये एकमेकांबद्दल सहकार्याची, आपुलकीची, प्रेमाची भावना असते.
वारकऱ्यांची दिनचर्या
वारी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्ये विविध प्रकार आहेत. मानाच्या दिंडीतील तसेच फड परंपरेतील वारकरी हे संतांचे पालखी सोहळ्यासोबत आळंदी, देहू आदी ठिकाणाहून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात. पौर्णिमेचा काला करून पुन्हा देहू आळंदी असा पायी प्रवास परतवारी करतात. तर बहुतांश वारकरी हे संतांचे पालखी सोहळ्यासोबत आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात आणि द्वादशीचे भोजन करून आपापल्या गावी परततात. साधारण 1 महिन्याच्या या सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना दररोज रात्री 2 वाजता उठावे लागते. तेथून त्यांची दिनचर्या सुरू होते.
स्नान करून साधारण तीन साडेतीनच्यादरम्यान काकड आरती सुरू होते. आधीच्या दिवशी सायंकाळी समाज आरतीच्या वेळी चोपदारांनी पुढील मुक्कामासाठी निघण्याची वेळ सांगितलेली असते. निघायच्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधी पताकावाले टाळकरी तसेच सर्व वारकरी सज्ज राहतात. कर्णा वाजवून निघण्याचा इशारा होताच सर्वजण क्रमानुसार चालतात. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सर्वात पुढे नगारखाना त्यामागे 27 क्रमांकाची दिंडी नंतर अश्व आणि त्यामागे क्रमानुसार 26 दिंड्या, नंतर पालखी रथ आणि मागे मानाच्या 20 आणि इतर शेकडो दिंड्या चालतात. सकाळी राम कृष्ण हरी भजन, ज्ञानोबा तुकाराम भजन, काकड आरती, वासुदेव, आंधळा, बहिरा हे भजन गात वारकरी चालतात.
यावेळी 80, 90, 100 वर्षांच्या वारकऱ्यांच्या उत्साह अर्वणनीय असतो. काही वेळ चालल्यानंतर सकाळचा पहिला विसावा होतो. पालखी थांबवली जाते आणि वारकरी न्याहरी, नाश्ता करतात. पुन्हा वाटचाल सुरू होते. त्यानंतर दुपारच्या भोजन विसाव्यापर्यंत भजन सुरू राहते. भोजन विसावा संपवून पालखी पुन्हा मार्गस्थ होते आणि सायंकाळच्या विसाव्यानंतर हरिपाठ होऊन पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. मानाच्या दिंडीतील वारकरी समाज आरतीसाठी नियमाप्रमाणे आपापल्या जागी उभे राहतात. समाज आरती नंतर कीर्तन, जागर झाल्यावर वारकरी आपल्या राहुट्यांमध्ये विसावतात. रात्री दहा वाजताच्या दरम्यान विसावलेल्या वारकऱ्यांना पुन्हा पुढील मुक्कामी पोहोचण्यासाठी दोन वाजता उठावे लागते आणि पुन्हा तोच दिनक्रम सुरू होतो. हे वारकरी थकत नसतात, कारण त्यांना विठ्ठलभेटीची ओढ असते.