मुंबई – शिवसेना (ठाकरे गट) मध्ये वर्धापनदिनापूर्वीच खळबळ उडाली आहे. उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिनापूर्वीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहे. आज सकाळपासूनच विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर काल शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. या कारणामुळे ठाकरे गटाला एका मागून धक्के बसत आहे.
आज सकाळपासून मनीषा कायंदे ह्या नॉट रिचेबल आहेत. ठाकरे गटाने आयोजित केलेल्या शिबिराला उपस्थित राहिलेल्या नाहीत. आहेत मनीषा कायंदे ह्या आता शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “काही लोक स्वार्थासाठी पक्षात येतात आणि स्वार्थासाठी निघून जातात. त्यांच्या निघून जाण्यानं शिवसेनेला कोणताही धक्का बसला नाही. स्वार्थी लोकांना ओळखण्यात आमची चूक झाली आहे. उडती पाखरे स्वार्थासाठी येतात आणि स्वार्थासाठी जातात. गेल्या अनेक वर्षात ही चूक झाल्याचे मी वारंवार सांगितले. मात्र आता यापुढे काळजी घेतली जाईल.”
खासदार विनायक राऊत यांनी मनीषा कायंदे यांच्यावर टीका केली आहे. विनायक राऊत म्हणाले की, “याची कल्पना आम्हाला दोन महिन्यांपासून होती. विधानपरिषदेवर पुन्हा संधी मिळण्यासाठी गद्दारी आणि बेईमानी केली आहे. काही अतृप्त आत्मे स्वार्थासाठी जात आहे. यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एवढा मोठा मानसन्मान प्राप्त करून दिला. आज शिवसेना पक्षाला गरज असताना उपकारकर्त्यांशी बेईमानी करून सत्तेसाठी राजकारणाच्या डबक्यात उडी मारत आहेत. तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही.” दरम्यान, मनीषा कायंदे ह्या ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत.