– हेमंत देसाई
“आप’विरुद्ध विरोधकांची एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न पंजाबमधील “अजित’ हे वृत्तपत्र करत आहे. दक्षता विभागाने “अजित’चे बर्जिंदर सिंग हमदर्द यांना चौकशीसाठी बोलावले होते.
स्वातंत्र्य चळवळीत भारतातील वृत्तपत्रांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, आगरकर, लोकहितवादी अशा अनेकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आणि जनमत संघटित केले. स्वातंत्र्योत्तर काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिभेद, आर्थिक व सामाजिक विषमता याबद्दलचे प्रश्न आणि दलितांना दिली जाणारी वाईट वागणूक याबद्दलची प्रखर मांडणी आपल्या वृत्तपत्रांमधून केली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या “मराठा’ या दैनिकाने ऐतिहासिक कामगिरी बजावली. “प्रभात’कार वा. रा. कोठारी यांची या आंदोलनातील कामगिरी कोण विसरेल! आणीबाणीत मेनस्ट्रीम, ओपिनियन, साधना या नियतकालिकांनी निर्भयपणे आपले कर्तव्य बजावले. आज प्रसारमाध्यमांचे रूप बदलले आहे. काही पत्रकार युट्यूब, वेबसाइट्सच्या माध्यमांतून आपापली भूमिका निभावत आहेत.
पंजाबमध्ये “आप’ने भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडली असून, एक हेल्पलाइनच सुरू केली आहे. जो सरकारी कर्मचारी वा अधिकारी पैसे मागेल, त्याच्याविरुद्ध थेट तक्रार करण्याची सोय त्यांनी उपलब्ध केली आहे. अनेक कल्याणकारी उपक्रम सुरू केले असून, इमेज बिल्डिंगसाठी जाहिरातबाजीही चालवली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये कॉंग्रेसचा सफाया झाला असून, शिरोमणी अकाली दल कमजोर आहे. भाजपची शक्ती तिथे मुळात कमी आहे. अशावेळी विरोधी पक्षाची ताकद नसल्यामुळे सत्तेत असलेला “आप’ हा पक्ष मुजोरपणा करू शकतो. देशात, राज्यात विरोधी पक्ष दुबळा होणे हे लोकशाहीच्या दृष्टीने वाईटच आहे. अशावेळी “आप’विरुद्ध विरोधकांची एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न पंजाबमधील “अजित’ हे आघाडीचे वृत्तपत्र करत आहे, हे विशेष म्हणावे लागेल.
पंजाबच्या दक्षता विभागाने नुकतेच “अजित’चे मुख्य संपादक बर्जिंदर सिंग हमदर्द यांना चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर कॉंग्रेस, शिरोमणी अकाली दल, भाजप, बहुजन समाज पक्ष, शिरोमणी अकाली दल संयुक्त, पीपल्स वेल्फेअर पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जालंदरमधील “अजित’च्या कार्यालयात एक बैठक घेतली. अजित हे वृत्तपत्र 1954 साली बर्जिंदर सिंग यांचे वडील साधूसिंग हमदर्द यांनी सुरू केले. त्यांचे उर्दू वर्तमानपत्रही आहे. हे वृत्तपत्र म्हणजे पंजाबमधील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे, असे मानले जाते. त्याचा ग्रामीण भागातील खप मोठ्या प्रमाणावर आहे.
“पंजाब, पंजाबी आणि पंजाबीयत’ हे “अजित’चे घोषवाक्य आहे. “अजित’ हे वृत्तपत्र मुळात 1941 मध्ये लाहोरला सुरू झाले. भारताचे माजी संरक्षणमंत्री बलदेव सिंग यांच्या कुटुंबियांनी ते चालू केले होते. साधू सिंग हे अकाली दलाच्या विचारांचे होते. परंतु ज्येष्ठ अकाली नेते मास्टर तारासिंग यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. साधू सिंग हे प्रकाशसिंग बादल यांच्या बाजूचे होते. पंजाबी सुभा चळवळ सुरू झाली, ती पंजाबी भाषकांसाठी स्वतंत्र राज्य हवे, या मागणीकरिता. त्यासाठी साधू सिंग रस्त्यावर उतरले आणि त्यांनी तुरुंगवास भोगला. भिद्रनवालेच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये दहशतवाद माजला होता. अतिरेक्यांनी सुवर्णमंदिराचा आश्रय घेतला होता. सुवर्णमंदिरातील खलिस्तानी अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी जून 1984 मध्ये इंदिरा गांधी सरकारने “ऑपरेशन ब्लू स्टार’ सुरू केले. त्याच्या निषेधार्थ साधूसिंग यांनी आपल्याला मिळालेला “पद्मश्री’ किताब परत केला होता.
त्यानंतर लवकरच त्यांचे देहावसान झाले. परंतु साधूसिंग यांचे वेगळेपण असे की, त्यांनी आपली सर्व मालमत्ता एका सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या नियंत्रणाखाली आणली आणि आपल्या कुटुंबातील कोणीही त्याचे सदस्य असता कामा नये, असे मृत्युपत्रात लिहून ठेवले. त्यावेळी बर्जिंदरसिंग यांचे आपल्या वडिलांशी मतभेद झाले होते आणि ते तेव्हा “अजित’मध्ये नव्हते. तेव्हा त्यांनी आपले एक मासिक सुरू केले होते. परंतु विख्यात पत्रकार कुलदीप नायर यांनी बर्जिंदर यांना “तुम्ही आता “अजित’ची जबाबदारी घ्याच, ते योग्य ठरेल’, अशी सूचना केली. त्यानंतर बर्जिंदरसिंग यांनी व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. परंतु ते हे वृत्तपत्र ज्या ट्रस्टच्या मालकीचे आहे, त्या ट्रस्टचे सदस्य नाहीत. शिखांच्या समस्या आणि अकाली दलाचे राजकारण याबाबत सहानुभूतीची भूमिका घेणाऱ्या या वृत्तपत्राने अतिरेक्यांच्या बाजूची भूमिका घेतली, असाही आरोप झाला होता. परंतु हा आरोप वृत्तपत्राशी संबंधित व्यक्ती फेटाळून लावतात.
एक लक्षात घेतले पाहिजे की, पंजाबमध्ये 1990 च्या दशकात जेव्हा अतिरेक्यांनी धिंगाणा सुरू केला होता, तेव्हा कम्युनिस्ट सोडून कोणीही त्याविरुद्ध प्रखर भूमिका घेतली नव्हती. कारण तशी भूमिका घेणे म्हणजे मरणास सामोरे जाणे असेच होते. अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते अतिरेक्यांच्या गोळीबारात मरण पावले. त्यावेळी अकाली दलात बादल, सुरजितसिंग बर्नाला हे मवाळपंथीय अकाली नेते होते. झैलसिंग हे देशाचे राष्ट्रपती होते, परंतु त्यांना देखील सुवर्णमंदिराच्या कारवाईनंतर शीख समाजाच्या रोषास सामोरे जावे लागले होते. पंजाबमध्ये 1992 ते 95 दरम्यान कॉंग्रेसचे बियांत सिंग हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी “अजित’चे जाहिरातफलक रस्त्यांवरून काढून टाकण्यात आले होते. तसेच सरकार त्यांना जाहिराती देत नव्हते. अर्थात बियांत सिंग यांची पुढे हत्या झाली, हा भाग वेगळा.
आज भाजपमध्ये असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग कॉंग्रेसमध्ये असताना 2002 ते 2007 या काळात मुख्यमंत्री होते. तेव्हाही सरकारी जाहिराती “अजित’ला मिळत नव्हत्या. गेल्या वर्षी आम आदमी पक्षाचे सरकार पंजाबमध्ये आले. सरकारच्या चुका दाखवून देणे आणि त्यावर टीका करणे हा माध्यमांचा अधिकारच असतो. पण “अजित’ने “आप’ सरकारवर टीका सुरू करताच, सरकारने त्याच्या जाहिराती थांबवल्या. तेव्हा बर्जिंदर सिंग यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे त्या संदर्भात तक्रारवजा पत्र दिले. प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री असताना, स्वातंत्र्यचळवळीतील हुतात्म्यांचे एक स्मारक 315 कोटी रुपये खर्च करून जालंदरमध्ये उभारण्यात आले होते. या प्रकल्पातील निधीचा गैरवापर झाला, असा आरोप आता “आप’ सरकारने ठेवला आहे.
स्मारकासाठी निम्न दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आणि अन्यही अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाले, लेखापरीक्षण करण्यात आले नाही, अशाही तक्रारी करण्यात आल्या आहेत. अर्थात, या गोष्टीचा वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या मुद्द्याशी संबंध नाही. परंतु “अजित’ हे वृत्तपत्र सरकारच्या बाजूचे नाही, हे देखील खरेच आहे. दुसरा मुद्दा असा आहे की, पंजाबात अकाली दल व भाजपचे सरकार असताना “रोजाना स्पोक्समन’ नावाच्या वृत्तपत्रास जाहिराती दिल्या जात नव्हत्या आणि त्याबद्दल बर्जिंदर सिंग यांनी चकार शब्दही काढला नव्हता.