– सुनीलकुमार सरनाईक
आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. यंदा प्लॅस्टिकबंदीवर भर दिला जाणार आहे. मात्र झाडे लागवडीकडेही दुर्लक्ष नको. आज मोठ्या प्रमाणावर झाडे लावून ती जगवली पाहिजे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे सर्वाधिक भारतीयांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. मात्र अलीकडच्या काळात शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. याचे कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे ऋतूचक्र बदलत चालले आहे. निसर्गातील अनियमितता तसेच निसर्गाचा कोप यामुळे संपूर्ण जगातील मानवी जीवन संकटमय व असुरक्षित झाले आहे. अर्थात, बदलत्या हवामानामुळे शेतीचे तर प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहेच, शिवाय निसर्गाची अनमोल संपत्ती असणारे वने, जलसंपदा यांचेही नुकसान होत आहे. याचा कृषी उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पाऊस, गारांसह मुसळधार पाऊस, प्रचंड वादळवाऱ्यामुळे होणारे नुकसान त्याचबरोबर नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास, प्रचंड दुष्काळ यामुळे जागतिक पर्यावरणाचा प्रश्न “आ’ वासून उभा राहिला आहे.
जागतिक पर्यावरण धोक्यात आले आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करणे, अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जगाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे, शिवाय निसर्गातील सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा बसेल, असे आपल्या सर्वांचेच वर्तन असले पाहिजे. दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण देशभर आपण साजरा करतो. “सोल्युशन फॉर प्लॅस्टिक पोल्युशन’ अशी थीम यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची आहे म्हणजे प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपायांवर आधारलेली आहे. पर्यावरणाचे संतुलन व पर्यावरण रक्षण या उद्देशाने प्रतिवर्षी अनेक संस्था, तरुण मंडळे, रोटरी, लायन्स, जायंट्स यांसारखे आंतरराष्ट्रीय क्लब वृक्षारोपणाचे कार्यक्रमही आयोजित करतात, हे स्वागतार्ह आहे.
अत्यंत उत्साहात गावोगावी झालेल्या या समारंभपूर्वक सोहळ्याची प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीसुद्धा केली जाते. प्रतिवर्षी हजारो, लाखो झाडांचे रोपण करण्यात येते; मात्र गेल्या पाच वर्षांतील अनेक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे सर्वेक्षण केले तर या लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली अथवा टिकली आहेत? याचे उत्तर समाधानकारक मिळत नाही. वृक्षारोपण जरी मोठ्या प्रमाणात होत असले तरी पर्यावरणाच्या दृष्टीने अशा कार्यक्रमांचा परिणाम फार मोठा होतो, असे दिसत नाही. त्याची कारणमीमांसा किंवा वृक्षारोपणाच्या परिणामांची चिकित्सा प्रत्येक पर्यावरणदिनी होणे अगत्याचे आहे.
पर्यावरणदिनी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी त्याला किमान एक ते दीड वर्ष होईपर्यंत कायमस्वरूपी पाणी मिळेल, अशी व्यवस्था जेथे आहे अशाच जागी वृक्षारोपण समारंभाचे कार्यक्रम हाती घ्यावेत. पाणथळ जागेत सतत ओलावा असतो तेथे अशा वृक्षांची लागवड करावी. वृक्षारोपण करण्यापूर्वी योग्य नियोजन करावे, असे करताना तेथील पाण्याची उपलब्धता, जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता आणि जमिनीचा प्रकार पाहून वृक्षांची निवड करण्यात यावी, वृक्षारोपण केल्यावर त्याचे मोकाट जनावरे व इतर घटकांकडून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
वृक्ष संरक्षणाच्या दृष्टीने योग्य त्या “ट्री गार्ड’ची निवड करावी, ते कायमस्वरूपी टिकतील याकडे लक्ष ठेवले पाहिजे, पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाबरोबरच उपलब्ध वृक्षांचे संरक्षण व संगोपन व्हावे याकरिता समाजात जाणीव आणि जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. सिंचन क्षमता वाढविणारे छोटे-छोटे प्रकल्प हाती घेतल्यास वृक्षारोपणास ते पूरक ठरतील. त्यामध्ये नाला अडवून त्यावर प्रत्येक हजार फुटांवर बंधारा (मातीचा) बांधून त्याला सांडवा काढून दिल्यास बंधाऱ्यांची मालिका तयार होऊन पावसाचे पाणी अडवून जमिनीतील पाण्याची खोल गेलेली पातळी बरीच वर येऊ शकते. भूमिगत बंधारा अतिशय कमी खर्चातील प्रकल्प असून त्याचीसुद्धा पाणी जिरविण्याची क्षमता मोठी आहे.
वाहत्या नाल्यांमध्ये किंवा नदीमध्ये किंवा खडक अथवा मुरुम लागेपर्यंत एक ते दीड फूट रुंदीचा संपूर्ण (रुंदी) खड्डा घेऊन त्यातील माती बाजूला काढावी व तो चर काळ्या मातीने भरून त्यावर मुरूम टाकावा. काळ्या मातीच्या गुणधर्मामुळे पाणी आपसूक अडवले जाऊन जमिनीत मुरण्याची प्रक्रिया होते. याचा फायदा पुढे उन्हाळ्यामध्ये दिसून येतो. शासनाने पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण एक समारंभ न करता एप्रिल ते मे या कालावधीमध्ये पावसाचे पाणी साठविण्याचे नियोजन करावे, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजनाद्वारे जमिनीमधील पाण्याची पातळी वर येण्यास मदत होते. वरील उपक्रम शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविल्यास विधायक कार्य वेळेवर व कमी खर्चात होऊ शकते.
गावतळी, शेततळी, भूमिगत बंधारे, साठवण बंधारे व वृक्षारोपण हे सर्व राबविताना पाण्याच्या नियोजनाबरोबरच वृक्षारोपणाचा विधायक कार्यक्रम एप्रिल ते जून-जुलै अखेर होऊ शकतो, त्यामधून पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेती उत्पादन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर वृक्षारोपणामुळे पावसाच्या प्रमाणावर अपेक्षित परिणाम होऊन पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यास मदत होईल. अलीकडच्या काळात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे तसेच जंगलात वणवा पेटण्याच्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात वारंवार घडत आहेत,अशा वृक्षतोडीमुळे व वणव्यामुळे वनसंपदेचे अतोनात नुकसान होत आहे.
यासर्व मानवी संकटांमुळे पर्यावरण धोक्यात आले आहे, पर्यावरणाचा असमतोल निर्माण करण्यासाठी सर्वस्वी मानवजातीला जबाबदार धरले पाहिजे, वृक्षतोड कायद्याने थांबवली पाहिजे, याउलट प्रत्येक नागरिकाला वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्यासाठी कायद्यानं बंधनकारक केले पाहिजे. शिवाय सुधारणांच्या नावाखाली अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते आहे, ते रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा प्रदूषण करणाऱ्या प्रवृत्तींवर कडक कारवाई केली पाहिजे. आता पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक जण कंबर कसून उभा राहिला पाहिजे, सरकारनेसुद्धा पर्यावरण धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी.