पुणे -पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पंढरीच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. याबैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. ज्याप्रमाणे गणपती उत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई ते कोकण या मार्गावरील सर्व टोल नाक्यावर टोल माफी दिली होती. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या वाहनांसाठी सर्वच मार्गांवर टोल माफी द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी मागील आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारकऱ्यांनी केली होती.
मुख्यमंत्र्यांकडूनही सूचना
पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले. ते म्हणाले की, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमतून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये, असे नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरू होणार नाहीत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.