मुंबई – कॉंग्रेस नेते व माजी आमदार आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना कॉंग्रेसमधून 7 एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले होते आणि आता 23 मे रोजी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील संयुक्त सभेला नाना पटोले अनुपस्थित होते.
हे निमित्त साधून देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर कठोर टीका केली होती व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पटोले यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दर महिन्याला खोके मिळतात. त्यामुळे ते त्यांच्यावर टीका करीत नाही. मात्र भाजपा नेत्यांवर टीका करतात, असा आरोप देशमुख यांनी केला होता.
देशमुख यांनी यापूर्वी राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी, असेही म्हटले होते. देशमुख वरिष्ठ नेत्यांबद्दल वारंवार आरोप आणि टीका करतात. त्यांच्या माध्यमातील विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने याबाबत त्यांना स्पष्टीकरण मागण्यात आले होते. तोपर्यंत माध्यमात वक्तव्य करू नये, असेही बजाविण्यात आले. कारणे दाखवा नोटीसला तीन दिवसांत उत्तर न दिल्यास पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार होती. त्या नंतर देशमुख यांनी 9 एप्रिल रोजी नोटिशीला उत्तर दिले होते. मात्र, त्यातही आपली मुजोरी कायम ठेवली होती.
आपण आपले पक्षविरोधी वर्तन व जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे कॉंग्रेसमधील शिस्तपालन समितीने सहा वर्षासाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निष्कासित केल्याचे शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रात नमुद केले आहे.
भाजपची सावनेरमधून उमेदवारी?
भाजपचा नागपूरलगतच्या सावनेर विधानसभा मतदार संघावर डोळा आहे. त्यामुळे देशमुखांना गाठीशी बांधून फडणवीस ही जागा आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत आहेत. भाजप येथून देशमुखांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. सध्या ही जागा कॉंग्रेसच्या सुनील केदार यांच्या ताब्यात आहेत. स्वतः देशमुखांचाही या मतदार संघावर डोळा आहे.
सावनेर हा आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख यांचा मतदार संघ होता. पण 1996 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून सुनील केदार यांनीच रणजित देशमुखांचा पराभव केला होता. यामुळे देशमुखांवरील या मतदार संघावरील वर्चस्व संपुष्टात आले होते. आता आशिष देशमुख भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत आहेत.