रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील वाघाळे, गणेगाव खालसा, वरुडे परिसरातील चासकमान चारीवरील कृषीपंपांची पाइप तोडण्याचे काम पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे शेतकरी कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जात आहेत.
शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या मोगलाईला कायमच सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची दाणादाण उडवण्याचे काम पाटबंधारे विभाग करीत आहे. शिरूरच्या पूर्व भागात चासकमानचे पाणी पोहोचत नाही. चासकमान व डिंभा कालव्याच्या पाण्यामुळे बागायती शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, अधिकाऱ्यांच्या वृत्तीमुळे व पाणीवाटपातील भेदभावामुळे शेतकरी कंगाल होण्याची चिन्हे आहेत.
सुरुवातीला पाणी वितरण करताना तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल न करता स्वतःचे खिसे भरण्यात धन्यता मानली. दिवसेंदिवस पाण्याच्या वापर वाढला, पण शासनाचा महसूल कमी पडू लागला तेव्हा पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना पाणीपट्टी वसुलीची आठवण झाली. मात्र, यात बराच कालावधी निघून गेला होता.
कोयत्याने अघटित घटना घडली तर…
कोयते घेऊन पाइप तोडणाऱ्या अधिकाऱ्यांकडून रागाच्या भरात चुकून एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला झाला व एखादी अघटित घटना घडली, तर जबाबदार कोण? संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोयत्याने पाइप तोडायचे अधिकार कोणी दिले. ज्या शेतकऱ्यांचे पाइप तोडले, त्यांना नुकसानभरपाई कोण देणार, असा संतप्त सवाल उमटत आहे.